Jaipur Crime News : जयपूरच्या करधनी परिसरात एकाने पत्नी आणि तीन मुलींची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घरातील सर्वजण झोपेत असताना आरोपी राहुल झा याने दगडाने पत्नी आणि तीन मुलींवर हल्ला केला. या हल्ल्यात गीता झा, 23 वर्षीय नंदिनी, 18 वर्षीय राधिका आणि 14 वर्षीय गौरी यांचा मृत्यू झाला. गोविंद वाटिका परिसरात घडलेल्या या घटनेची माहिती शुक्रवारी सकाळी सुमारे 10 वाजता पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराची तपासणी केली असता पहिल्या मजल्यावरील एका खोलीत गीता झा यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर तळमजल्यावरील दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये तीन मुलींचे मृतदेह आढळले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : बीड: अंबाजोगाईत इमारतीचा स्लॅब भरताना दुर्घटना, विजेच्या धक्क्याने दोघांचा अंत
चारही जणी गाढ झोपेत असताना भंयकर हल्ला
पोलिसांच्या माहितीनुसार, चारही जणी गाढ झोपेत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. चारही मृतांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापतीच्या खुणा आढळल्या आहेत. घटनास्थळावरून पोलिसांना एक दगडही मिळाला असून, त्याचा हल्ल्यासाठी वापर झाल्याचा संशय आहे. डीसीपी वेस्ट प्रशांत किरण यांच्या माहितीनुसार, ही घटना रात्री उशिरा घडल्याची प्राथमिक शक्यता आहे. पोलिसांकडून घटनास्थळावर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे त्या रात्रीची संपूर्ण घटनाक्रमाची वेळ निश्चित करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात राहुल झा याच्यावर पत्नी आणि तीन मुलींच्या हत्येचा आरोप असून, तो सध्या फरार आहे.
हेही वाचा : विद्यार्थीनी शाळेत जाताना नराधम करायचा पाठलाग, पीडितेनं कंटाळून संपवलं जीवन
घरी परतून वृद्ध वडिलांना चहा पाजला, अन् आरोपी निघून गेला
या घटनेनंतर पोलिसांच्या तपासात सकाळच्या वेळेतील राहुल झा याच्या हालचालींची माहितीही समोर आली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, हत्या केल्यानंतरही राहुल झा याचे वर्तन सामान्य असल्याचे दिसून आले. सकाळी सुमारे 7 वाजता तो दूधवाल्याकडून दूध घेण्यासाठी गेला. त्यानंतर घरी परतून त्याने आपल्या वृद्ध वडिलांसाठी चहा बनवला आणि त्यांना चहा पाजला. त्यानंतर तो घरातून निघून गेला आणि फरार झाला. राहुल झा शेअर ट्रेडिंगचे काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे. तो काही दिवसांपूर्वीच गुजरातमधून जयपूरला परतला होता. त्याची पत्नी गीता झा पहिल्या मजल्यावर ब्युटी पार्लर चालवत होत्या. मोठी मुलगी नंदिनी शिक्षणासोबत खासगी नोकरीही करत होती.
पोलिसांना या प्रकरणाच्या तपासादरम्यान आणखी एक माहिती मिळाली आहे. घटनेच्या सुमारे तीन दिवस आधी राहुल झा याने शेजारी राहणाऱ्या एका महिलेकडून 25 हजार रुपये उधार घेतल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी ही माहितीही तपासाचा भाग बनवली आहे. राहुल आर्थिक अडचणीत होता का, घरात कौटुंबिक वाद होता का, शेअर ट्रेडिंगमध्ये त्याचे नुकसान झाले होते का किंवा हत्येमागे आणखी कोणते कारण होते, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. आर्थिक अडचण आणि कौटुंबिक वादासह विविध शक्यतांचा तपास सुरू आहे. सध्या जयपूर पोलीस राहुल झा याचा शोध घेत आहेत. हत्येमागचे नेमके कारण आणि चार जणांच्या हत्येनंतर आरोपीचे कथित सामान्य वर्तन याबाबतचे चित्र त्याच्या अटकेनंतर आणि पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT












