Nagpur Crime : नागपूरमधील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. सोमवारी (29 जून) रात्री पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली. फुटाळा तलाव परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा गँगवॉर भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असद उर्फ अमन शेख असे या मृत तरुणाचे नाव असून, तो शहरातील कुख्यात गुंड शेखूचा पुतण्या असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी योगेंद्र उर्फ लाला पांडे आणि जंगली पांडे हे असून पोलिसांनी रात्री उशिरा काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
कानशिलात लगावल्याने वाद
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदान भागात गुन्हेगारी टोळी चालवणारा लाला पांडे हा सोमवारी संध्याकाळी फुटाळा तलाव परिसरात मयूर जाधव नावाच्या तरुणाच्या दुकानावर बसला होता. संध्याकाळी सातच्या सुमारास अमन शेख तिथे पोहोचला आणि त्याने कथितरीत्या मयूरला धमकावण्यास सुरुवात केली. त्यावेळी लाला पांडेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. या वादात अमनने लालाच्या कानशिलात लगावली. या अपमानाचा बदला घेण्याची धमकी देत लाला तिथून निघून गेला.
हे ही वाचा : काय सांगता... कोणी तोडला चक्क भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या बंगल्याचा दरवाजा?
चाकू आणि तलवारीने सपासप वार
काही मिनिटांतच लाला पांडे त्याचा भाऊ जंगली पांडे आणि इतर सहा साथीदारांसह हत्यारे घेऊन फुटाळा तलाव परिसरात परतला. या टोळक्याने अमन शेखला गाठून त्याच्यावर चाकू आणि तलवारीने सपासप वार करण्यास सुरुवात केली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अमन पळत होता, मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून त्याची क्रूरपणे हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार या थरारक घटनेच्या वेळी फुटाळा परिसरात पोलिसांचे कोणतेही गस्ती पथक, वाहन किंवा बीट मार्शल उपस्थित नव्हते.
हे ही वाचा : Personal Finance: होम लोन EMI कमी करण्याच्या 3 भन्नाट टिप्स
टोळीयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता
या भीषण घटनेनंतर गिट्टीखदान पोलिसांनी तातडीने हत्येचा गुन्हा दाखल केला असून चौकशीसाठी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. एका कुख्यात गुंडाच्या पुतण्याची हत्या झाल्याने गिट्टीखदान परिसरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. उघडपणे घडलेल्या या हत्येमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिस प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.
ADVERTISEMENT











