लोहगड हत्या केस: चेतनसाठी 'तो' होता इशारा.. सिया खाली वाकली अन् केतनचा खेळ खल्लास!

केतन अग्रवालला लोहगडवर नेऊन मारण्यापूर्वी सिया आणि चेतन यांनी एक इशारा ठरवला होता. तो नेमका काय होता हे आता पोलीस तपासातून पुढं आलं आहे.

shocking revelations in ketan agrawal murder case prior reconnaissance at lohagad rehearsal for murder in rajasthan find out signal accused had decided upon for killing

लोहगड हत्या केस

निलेश झालटे

• 08:00 AM • 30 Jun 2026

follow google news

पुणे: देशभरात चर्चेत असलेल्या पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल याची हत्या ही क्षणिक रागातून नव्हे, तर अत्यंत थंड डोक्याने आखलेल्या कटाचा भाग होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी हत्येपूर्वी अनेक दिवस नियोजन केले होते. इतकेच नव्हे, तर गुन्हा यशस्वी करण्यासाठी त्यांनी रेकी, रिहर्सल आणि स्वतःची ओळख लपवण्याचीही संपूर्ण तयारी केली होती.

हे वाचलं का?

लग्न नको म्हणून रचला हत्येचा कट

पोलीस तपासानुसार, सिया गोयल हिचे केतन अग्रवाल याच्याशी लग्न ठरले होते. मात्र, तिला हे लग्न करायचे नव्हते. त्यामुळे तिने तिचा मित्र चेतन चौधरी याच्यासोबत मिळून केतनच्या हत्येचा कट रचला. 18 जून रोजी केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले आणि तेथून त्याला खोल दरीत ढकलण्यात आले. या घटनेत केतनचा मृत्यू झाला.

हे ही वाचा>> केतनच्या हत्येपूर्वी सिया आणि चेतनने गुगलवर जे शोधलं ते ऐकून हादरून जाल

सियाच्या एका इशाऱ्यावर चेतनने दिला धक्का

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हत्येसाठी एक ठरावीक संकेत निश्चित केला होता. लोहगडावर पोहोचल्यानंतर सिया पाणी पिण्याच्या किंवा बुटाची लेस बांधण्याच्या बहाण्याने खाली बसणार, हा चेतनसाठी हल्ल्याचा इशारा होता. सिया खाली बसताच चेतनने पाठीमागून येत केतनला खोल दरीत ढकलले.

स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सियाची युक्ती

पोलिसांच्या मते, सिया खाली बसण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण होते. केतनला धक्का दिल्यानंतर तो स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात सियाचा हात पकडू शकला असता. तसे झाल्यास सियाही त्याच्यासोबत दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठीच ती केतनपासून काही अंतरावर खाली बसली होती.

हे ही वाचा>> 'अपघाताची केस मर्डरची कशी झाली?' सियाचे वकील कोर्टात कोणता युक्तीवाद करणार?

यावरून आरोपींनी गुन्ह्याच्या प्रत्येक शक्यतेचा आधीच विचार केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

टोल नाक्यावरील नोंद टाळण्यासाठी स्कूटरचा वापर

चेतन चौधरीने स्वतःची ओळख लपवण्यासाठीही विशेष खबरदारी घेतली होती. पुण्याहून लोहगडपर्यंत तो कारऐवजी स्कूटरवर गेला, जेणेकरून टोल नाक्यावर वाहनाची कोणतीही नोंद होणार नाही. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.

हुडी घालून बदलला पेहराव

लोहगडावर पोहोचल्यानंतर चेतनने आपला पेहराव बदलला. त्याने हुडी घालून किल्ल्यावर प्रवेश केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो या वेशात दिसून आला. त्यानंतर त्याने हुडी काढून वेगळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला.

तपास यंत्रणांच्या मते, स्वतःची ओळख लपवणे आणि दिशाभूल करणे हा त्यामागील उद्देश होता.

पोलिसांकडून घटनास्थळी 'क्राईम रिक्रिएशन'

रविवारी पोलिसांनी सिया गोयलला लोहगड किल्ल्यावर नेऊन डमी पुतळ्याच्या साहाय्याने संपूर्ण घटनेची पुनर्रचना (Crime Recreation) केली. यावेळी आरोपींनी गुन्हा नेमका कसा केला, कोणत्या ठिकाणी उभे होते आणि संपूर्ण कट कसा राबवला, याची माहिती पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी घेतली.

हत्येपूर्वी केली रेकी आणि सराव

चौकशीत दोन्ही आरोपींनी कबूल केले की, हत्या करण्यापूर्वी त्यांनी अनेक वेळा लोहगडावर जाऊन योग्य जागेची पाहणी केली होती. इतकेच नव्हे, तर हत्या कशी करायची याचा सरावही त्यांनी केला होता.

राजस्थानमध्येही घेतली होती हत्येची 'रिहर्सल'

तपासात समोर आलेल्या आणखी एका धक्कादायक माहितीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये सिया गोयल आणि चेतन चौधरी राजस्थानमधील जोधपूर येथे फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांनी मेहरानगड किल्ल्यावर अशाच प्रकारच्या हत्येची रिहर्सल केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या माहितीचीही पोलिसांकडून सखोल पडताळणी सुरू आहे.

हत्येच्या आदल्या दिवशी कॅफेमध्ये आखली अंतिम रणनीती

हत्येच्या एक दिवस आधी सिया आणि चेतन यांनी पुण्यातील लुल्लानगर परिसरातील एका कॅफेमध्ये भेट घेतली. यावेळी केतनची हत्या कशी करायची, त्यानंतर काय करायचे आणि संशय टाळण्यासाठी कोणती पावले उचलायची, याचे अंतिम नियोजन करण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे.

केतन पडल्यावरही दोन-तीन मिनिटे शांत उभी राहिलेली सिया

पोलीस तपासातील आणखी एक बाब धक्कादायक मानली जात आहे. केतन दरीत कोसळल्यानंतर सियाने तात्काळ आरडाओरडा केला नाही. ती सुमारे दोन ते तीन मिनिटे शांत उभी राहिली. या काळात चेतन घटनास्थळावरून सुरक्षित निघून गेला आहे का आणि संपूर्ण प्रकार कोणाच्या नजरेत आला आहे का, याची खात्री तिने केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मदत मागण्याऐवजी आईला केला फोन

केतन दरीत पडल्यानंतर त्याला तातडीने मदत मिळवून देण्याऐवजी सियाने सर्वप्रथम आपल्या आईला फोन केला. त्यानंतर जवळपास 15 मिनिटे ती नातेवाईकांशी फोनवर बोलत राहिली. या विलंबामुळे केतनला वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली नाही, असेही पोलिस तपासात नमूद करण्यात आले आहे.

पोलीस तपासातून उलगडत आहे संपूर्ण कट

या प्रकरणात पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना अटक केली आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे हत्येच्या कटामागील नियोजन, तयारी आणि आरोपींच्या हालचालींबाबत नवे तपशील समोर येत आहेत. या प्रकरणातील सर्व पैलूंचा तपास सुरू असून, पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.