Crime News : एका साडेतीन वर्षीय मुलाचा छिन्न-विछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्याच घरापासून 25 मीटर अंतरावरील एका शेतात मृतदेह सापडला. 24 फेब्रुवारी पासून तो बेपत्ता होता. मुलाच्या अंगावरील कपडे आणि गळ्यातील काळ्या धाग्यावरून त्याची ओळख पटवण्यात आली. अंकुश असं या मृत मुलाचं नाव आहे. त्याची हत्या नेमकी का झाली जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : खामेनी, मुलगी-जावई-सून, टॉप कमांडर...इस्त्राईल आणि अमेरिकेने टिपून-टिपून मारले
हातांच्या हाडावर मांसच नाही
उत्तर प्रदेशातील फतेहपूरची ही घटना आहे. गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अंकुशचा मृतदेह अत्यंत विदारक अवस्थेत सापडला. त्याच्या शरीराचे अनेक अवयव गायब होते, तर डोके आणि हातांच्या हाडांवर मांसाचा लवलेशही नव्हता. सुमारे 15 मीटर अंतरावर मुलाचा एक डोळा पडलेला आढळला, ज्यामुळे उपस्थितांच्या काळजाचा थरकाप उडाला. या भीषण अवस्थेमुळे ग्रामस्थांनी ही नरबळी किंवा तंत्र-मंत्रची घटना असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सणासुदीच्या काळात तांत्रिक अशा घटना घडवून आणतात, असा आरोप करत ग्रामस्थांनी असाही दावा केला की, मुलाची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह मुद्दाम जंगली प्राण्यांसमोर टाकला असावा.
ग्रामस्थ अन् पोलिसांमध्ये वादावादी
मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांना ग्रामस्थांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला. शेकडो लोकांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन पोलिसांना घेराव घातला आणि या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पाल सिंह आणि ग्रामस्थांमध्ये जोरदार वादावादी झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून रक्ताने माखलेली माती, केस आणि कपड्यांचे नमुने गोळा केले. प्राथमिक तपासात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असला, तरी ग्रामस्थ मात्र हत्येच्या आरोपावर ठाम आहेत.
हे ही वाचा : क्रिकेटपटू शोएब मलिक आता चौथं लग्न करणार? सानिया मिर्झाबाबतही मोठं वक्तव्य...
मुलांना शाळेत पाठवणं केलं बंद
या घटनेमुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण पसरले असून पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवणे बंद केले आहे. जोपर्यंत या घटनेचा उलगडा होत नाही आणि सुरक्षा वाढवली जात नाही, तोपर्यंत मुले सुरक्षित नसल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. दररोज 12 शिपाई आणि 3 फौजदार मुलाचा शोध घेत असतानाही, घराच्या इतक्या जवळ असलेल्या शेतात मुलाचा मृतदेह पोलिसांना का सापडला नाही, यावरून संताप व्यक्त केला जात आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT











