भाजपने अधिवेशनात विधानसभेचं पावित्र्य राखलं नाही-अजित पवार

मुंबई तक

• 11:41 AM • 06 Jul 2021

भाजपने अधिवेशनात सभागृहाचं पावित्र्य राखलं नाही. सोमवारी झालेला गोंधळ कमी की काय? म्हणून भाजपने आजही प्रति विधानसभा भरवली. आम्ही इतक्या वर्षांपासून विधानसभेत येत आहोत. बाळासाहेब थोरात हे आत्ता आमच्यात सगळ्यात वरिष्ठ आहेत. ते अनेक वर्षांपासून या विधानसभेत येत आहेत. आम्हीही आमदार म्हणून 90 च्या दशकापासून येत आहोत. पण अशा प्रकारे सभागृहाचं पावित्र्य न राखण्याची परंपरा […]

Mumbai Tak
Google CTA

भाजपने अधिवेशनात सभागृहाचं पावित्र्य राखलं नाही. सोमवारी झालेला गोंधळ कमी की काय? म्हणून भाजपने आजही प्रति विधानसभा भरवली. आम्ही इतक्या वर्षांपासून विधानसभेत येत आहोत. बाळासाहेब थोरात हे आत्ता आमच्यात सगळ्यात वरिष्ठ आहेत. ते अनेक वर्षांपासून या विधानसभेत येत आहेत. आम्हीही आमदार म्हणून 90 च्या दशकापासून येत आहोत. पण अशा प्रकारे सभागृहाचं पावित्र्य न राखण्याची परंपरा आम्ही कधीही पाहिली नाही. अनेकदा आमचेही मतभेद झाले. पण सोमवारी जे घडलं ते आजवरच्या इतिहासात कधीही पाहिलं नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे.

हे वाचलं का?

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या इथे जाऊन गोंधळ घालणं. त्यानंतर त्यांच्या दालनात जाऊन त्यांना शिवीगाळ करणं ही सगळी बाब अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी घटना सोमवारी घडली. 22 मार्च 2017 लाही ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या 19 आमदारांनी गोंधळ घातला होता त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. आम्ही त्यानंतर हल्लाबोल आंदोलनही केलं होतं पण प्रति विधानसभा वगैरे भरवली नाही. विरोधक ज्या प्रकारे वागले आहेत ते महाराष्ट्राच्या संस्कृती शोभणारं नाही त्यांचं वर्तन अशोभनीय होतं असं म्हणत अजित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.

सोमवारी काय घडलं होतं?

सोमवारी विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं तेव्हा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांचा आमना-सामना झाला. यासंबंधी चर्चा झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रस्ताव मांडला. तो प्रस्ताव संमत करण्यात आल्यानंतर भाजपच्या आमदारांनी राडा घातला. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या समोर जात काही आमदारांनी माईक खेचला तसंच घोषणाबाजीही केली. त्यानंतर दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. यानंतर जेव्हा पुन्हा कामकाज सुरू झालं तेव्हा भास्कर जाधव यांनी स्वतःच त्यांना त्यांच्या दालनात धक्काबुक्की झाल्याचं आणि शिवीगाळ झाल्याचं सभागृहात सांगितलं. यानंतर पावसाळी अधिवेशनात भाजपच्या बारा आमदारांवर निलंबनाची कारवाई वर्षभरासाठी करण्यात आली आहे. शिवसेनेने यासंदर्भातला ठराव मांडला गेला. तो एकमुखाने मंजूर करण्यात आला. ज्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली. भाजपने त्यानंतर महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली आहे.