आर्यन खान प्रकरणात मुंबई NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईनंतर राज्यात मोठा वादंग माजला होता. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करुन जोरदार आरोप केले. इतकच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही NCB ला टोमणा मारत, मुंबई पोलीसही हेरॉईन पकडतात पण तिकडे हिरॉईन नसते म्हणून त्याची चर्चा होत नाही असं म्हटलं होतं.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर NCB ने प्रथमच मुंबईबाहेर मोठी कारवाई केली आहे. नांदेड जिल्ह्यात NCB च्या मुंबई पथकाने कारवाई करत १ हजार १२७ किलो गांजा पकडला आहे. सोमवारी पहाटे ४ वाजल्याच्या दरम्यान NCB च्या पथकाने ही कारवाई केली. आंध्र प्रदेशातून आलेल्या ट्रकमध्ये गांजाने भरलेली ४९ पोती NCB ने जप्त केली आहेत. पकडलेला एकूण माल १.१ टन असल्याचं कळतंय. NCB ची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
मुंबईत या कारवाईबद्दल समीर वानखेडे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. “महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांत हा गांजा सप्लाय केला जाणार होता. आमच्या दोन अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती मिळाली होती. अमोल मोरे आणि सुधाकर शिंदे या दोन अधिकाऱ्यांनी माहिती मिळताच ३६ तासांपासून जाळ पसरवलं होतं.”
अखेरीस आज सकाळी हा ट्रक NCB च्या जाळ्यात सापडला. सुरुवातीला १५०० पोती गांजा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. परंतू यानंतर तपास केला असता १ हजार १२७ किलो गांजा असल्याचं समोर आलंय. NCB ची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कामगिरी असल्याचं समीर वानखेडे यांनी सांगितलं. आरोपीने ट्रकमध्ये गांडा लोखंडी पिंपात गोणपाटाखाली झाकून ठेवला होता अशी माहिती वानखेडे यांनी दिली.
NCB ने केलेल्या या कारवाईला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. नवाब मलिक यांनी आपल्या आरोपांमध्ये समीर वानखेडे बॉलिवूड इंडस्ट्रीला टार्गेट करत असल्याचं म्हटलं होतं. यासाठी नवाब मलिकांनी आपल्या पत्रकार परिषदेत अनेक पुरावेही दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही याचवरुन NCB ला लक्ष्य केलं होतं. आर्यन खानला हायकोर्टाकडून जामिन मंजूर झाल्यानंतर समीर वानखेडेंचे या प्रकरणातील चौकशीचे अधिकार काढून घेण्यात आले. त्यामुळे मुंबईबाहेर केलेल्या या कारवाईमुळे पुन्हा एकदा NCB ची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
ADVERTISEMENT