महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आजही मुलभूत सोयी-सुविधांची वानवा असल्यामुळे ओळखला जातो. आजही या जिल्ह्यातील अनेक आदिवासी तालुक्यांमध्ये लोकांना रुग्णाला उपचारासाठी न्यायचं असेल तर खांद्यावर घेऊन जावं लागतं.
ADVERTISEMENT
भामरागड तालुक्यातील छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असलेला भाग अबुझमाड म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी राहणाऱ्या एका १२ वर्षीय मुलीची तब्येत बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी घरच्या व्यक्तींना ३० किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागली.
१२ वर्षीय मुलगी मुरी पुंगाटी हिची तब्येत बिघडल्यानंतर तिला लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करायचं ठरवलं. परंतू रुग्णालयात जाण्यासाठी अँब्यूलन्स किंवा इतर कोणत्याही वाहनाची सोय नसल्यामुळे तिच्या घरच्यांनी मुरीला आपल्या खांद्यावर घेत ३० किलोमीटर पर्यंतची पायपीट केली.
सध्या मुरीवर याच आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. छत्तीसग सीमेलगत असलेल्या आदिवासी गावांतील लोकांना उपचारासाठी लाहेरी येथील आरोग्यकेंद्राची सुविधा आहे. त्यामुळे छत्तीसगडमधील गावकरी इथे उपचारासाठी येत असतात. एकीकडे बाकीचे जिल्हे प्रगतीपथावर असताना गडचिरोली जिल्ह्यांतील नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधांसाठी करावी लागणारी वणवण ही खरंच दुर्दैवी आहे.
ADVERTISEMENT
