बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, पश्चिम किनार्यावरील द्रोणीय स्थितीमुळे पुढील ४-५ दिवसात मुंबई, ठाण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढणार आहे.
ADVERTISEMENT
राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होत असून, पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. हवामान विभागाकडून पुढील तीन ते चार दिवसांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे पालघर, नाशिक, रायगड, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, गडचिरोली या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांसाठी आयएमडीकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, औरंगाबाद, जालना, चंद्रपूर या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
१३ जुलैला कसं असेल हवामान?
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची संततधार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
१४ जुलैला कोणत्या जिल्ह्यांत बरसणार पाऊस?
१४ जुलैला राज्यातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT