Uddhav Thackeray: ‘ठाकरे’ आणि ‘शिवसेना’ या दोन नावांशिवाय जगून दाखवा

मुस्तफा शेख

• 10:11 AM • 24 Jun 2022

ठाकरे आणि शिवसेना या दोन नावांशिवाय जगून दाखवा असं आव्हान आज उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांना दिलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा चौथा दिवस आहे. उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे असे दोन गट शिवसेनेत पडले आहेत. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आम्ही बाळासाहेब ठाकरे-आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना पुढे […]

Mumbaitak
follow google news

ठाकरे आणि शिवसेना या दोन नावांशिवाय जगून दाखवा असं आव्हान आज उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांना दिलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा चौथा दिवस आहे. उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे असे दोन गट शिवसेनेत पडले आहेत.

हे वाचलं का?

याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आम्ही बाळासाहेब ठाकरे-आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना पुढे नेत आहोत असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं आहे. अशात शिवसेना भवनावर आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेसंह सोबत गेलेल्या आमदारांना आव्हान दिलं आहे.

काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?

जे बाहेर पडले आहेत, ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांनी ठाकरे या आडनावाशिवाय आणि शिवसेना या नावाशिवाय जगून दाखवावं. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव कशाला घेता? तसंच शिवसेनेचं नाव तरी कशाला घेता हिंमत असेल तर या दोन नावांशिवाय जगून दाखवा.

मागच्या दोन वर्षांपासून कोव्हिडचं लचांड मागे लागलं आहे. कोव्हिडची समस्या संपते न संपते तोच माझ्या मानेला त्रास सुरू झाला. माझ्या मानेत ताण आला. खांद्यापासून पायापर्यंतची हालचाल बंद झाली. काहींना वाटलं आता हा बरा होत नाही. काही लोक अभिषेक करत होते. काही जण देव पाण्यात बुडवून बसले होते. माझी बोटंही नीट उघडत नव्हती. मात्र मला त्या सगळ्याची पर्वा नाही. मला आई जगदंबेने ताकद दिली आणि जबाबदारी दिली. कोण कोणत्या वेळी आपल्याशी कसं वागलं ते लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मी त्या दिवशी वर्षा बंगला सोडला आणि त्यासोबत मोहही सोडला. मात्र अजून जिद्द सोडलेली नाही.

मी मुख्यमंत्री होईन याचा विचारही केला नव्हता. त्या पदाचा मला कधीही मोह नव्हता. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी हेदेखील म्हटलं आहे की हे सगळं बंड मी घडवून आणलं. मात्र मी असं कशाला करेन? असा प्रतिप्रश्न विचारत त्यांनी ही शक्यताही परतवून लावली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधात बंडखोरी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी खळबळ माजली आहे. तसंच शिवसेनेत उद्धव ठाकरे गट विरूद्ध एकनाथ शिंदे गट असा सामना रंगला आहे. पक्षाची आणखी फाटाफूट रोखण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत एकनाथ शिंदे तसंच बंडखोरी केलेल्या आमदारांना आव्हान दिलं आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

जे आपली किंमत लावून बाहेर पडलेत त्यांना किंमत का द्यायची? याआधीही लोकांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. सत्ता येते-जाते. गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी जे काम केलं त्यासाठी लोक त्यांना पाठिंबा देत आहेत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच मला त्यावेळी माझी आई म्हणाली धोका मित्रपक्षांनी दिला असता तर काही वाटलं नसतं पण आपल्याच माणसाला ज्याला आपण मोठं केलं त्यानेच धोका दिला याचं वाईट वाटतंय असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

    follow whatsapp