महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांनी सोनिया गांधींसमोर खदखद केली व्यक्त; काय घडलं भेटीत?

मुंबई तक

• 03:31 AM • 06 Apr 2022

राज्यातील काँग्रेसच्या २२ आमदारांनी मंगळवारी सायंकाळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधीसमोर राज्यातील सत्तेत डावललं जात असल्यासह विविध मुद्द्यांसंदर्भातील खदखद व्यक्त केली. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. अखेर मंगळवारी ही भेट झाली. या भेटीत काँग्रेसच्या आमदारांनी सोनिया गांधी […]

Mumbaitak
follow google news

राज्यातील काँग्रेसच्या २२ आमदारांनी मंगळवारी सायंकाळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधीसमोर राज्यातील सत्तेत डावललं जात असल्यासह विविध मुद्द्यांसंदर्भातील खदखद व्यक्त केली.

हे वाचलं का?

दिल्ली दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. अखेर मंगळवारी ही भेट झाली. या भेटीत काँग्रेसच्या आमदारांनी सोनिया गांधी यांच्यासमोर विविध मुद्दे मांडले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या आमदारांना निधी मिळत नसल्याचं आमदारांनी सांगितलं.

सरकारमधील काँग्रेसचे मंत्रीच सर्व निधी वापरत असून, यामुळे इतर काँग्रेस आमदारांना निधीच मिळत नाही. त्यामुळे मतदारसंघात विकास काम करता येत नाहीये, असा तक्रारीचा सूर काँग्रेस आमदारांनी लावला.

आमदारांच्या शिष्टमंडळाने सोनिया गांधी यांना सांगितलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात जे काँग्रेसचे मंत्री आहेत, त्यांचा प्रभाव मंत्रिमंडळाच्या निर्णयावर दिसून ये नाही. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी मागितला जातो, मात्र तेही भेटत नाहीत. सरकारमध्ये जे काँग्रेसचे मंत्री आहेत, त्यांना बदलण्यात यावं, अशी मोठी मागणी या आमदारांनी सोनिया गांधी यांच्याकडे केली.

रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक मागील दीड वर्षांपासून होऊ शकलेली नाही. यासाठी सरकारकडून ठोस प्रयत्न केले जात नाहीयेत, असंही या आमदारांनी सोनिया गांधी यांना सांगितलं. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी भेटीनंतर बोलताना सांगितलं की, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आमदारांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्याचबरोबर आवश्यकता वाटल्यास त्यावर कार्यवाही करण्यात येईल, असंही सांगितलं आहे. सोनिया गांधी यांनी या सर्व तक्रारी लिखित स्वरूप देण्यास आमदारांना सांगितलं आहे, असं गोरंट्याल म्हणाले.

गडकरी-पवार आणि राऊत एकाच रांगेत, पवारांच्या दिल्लीतील घरात सर्वपक्षीय आमदारांचं स्नेहभोजन

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेस आमदारांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेतली आहे. २०१९ मध्ये निवडणूक निकालानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या आघाडीची चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडून शिवसेनेसोबत जाण्यास विरोध दर्शवला गेला होता. काँग्रेसच्या आमदारांचीही महाविकास आघाडी होण्यात महत्त्वाची भूमिका होती.

    follow whatsapp