Maharashtra corona Update : राज्यात ६ हजार ६८६ जण आढळले करोना पॉझिटिव्ह

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान थांबलं असल्यानं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे. त्यामुळे दिवसभरात आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत घट झालेली असली, तरी रुग्णसंख्येचं सातत्य कायम आहे. आजही राज्यात साडेसहा हजारांपेक्षा जास्त कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ६१ हजार रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दरम्यान, डेल्टा प्लस व्हेरिंएटमुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:41 PM • 13 Aug 2021

follow google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान थांबलं असल्यानं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे. त्यामुळे दिवसभरात आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत घट झालेली असली, तरी रुग्णसंख्येचं सातत्य कायम आहे. आजही राज्यात साडेसहा हजारांपेक्षा जास्त कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ६१ हजार रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दरम्यान, डेल्टा प्लस व्हेरिंएटमुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.

हे वाचलं का?

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज (१३ ऑगस्ट) ५,८६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. दिवसभरात घरी परतलेल्या रुग्णसंख्येसह राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ८० हजार ८७१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) ९६.८५ टक्के इतकं आहे. दुसरीकडे आज (१३ ऑगस्ट) राज्यात ६,६८६ नवीन रुग्णांचे निदान झाले.

नवीन रुग्णसंख्येबरोबरच राज्यात आज दिवसभरात १५८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत ५,०५,४५,५५२ नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात आले. त्यापैकी ६३,८२,०७६ (१२.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ३ लाख ७० हजार ८९० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २ हजार ६७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या ६३,००४ रुग्ण उपचाराधीन आहेत.

दोन डोस किंवा निगेटिव्ह रिपोर्ट; संसर्ग रोखण्यासाठी कडक पाऊल

राज्यात कोरोना संक्रमणाचा वेग मंदावला असला, तरी डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंतेत भर टाकण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर दिवसभरात पाच जणांचा मृत्यूही झाला आहे.

डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने आंतरराज्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नियमांचा फास आवळला आहे. लसीचे दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्र तसंच दोन्ही डोस घेऊन १४ दिवसाचा कालावधी पूर्ण होणं आवश्यक करण्यात आलं आहे. हे नसेल, तर आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा करण्यात आला आहे. अन्यथा १४ दिवस क्वारंटाइन केलं जाणार आहे.

    follow whatsapp