Crime News : एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना अनेक पुरावे गोळा करावे लागतात. अनेकांची चौकशी करावी लागते. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना बैलाने मदत केली आहे. बैलांच्या मदतीने पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश मिळाले आहे. 18 जानेवारी रोजी मध्यप्रदेशातील बंजाराटोला भागातील एका खाणीत हरोती बाई नावाच्या महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला होता. सुरुवातीला हा अपघात वाटत असला तरी, मृतदेहाच्या कमरेला आणि डोक्याला पोत्यात भरलेले दगड बांधलेले पाहून हा हत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. पोस्ट मार्टम अहवालातही तिची गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह दगडांच्या वजनाने पाण्यात बुडवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 15 तास ओलिस ठेवलं; विवस्त्र व्हिडिओ बनवला, महिलेनं कसं अडकवलं तरुणाला जाळ्यात?
'अशी' केली बैलांनी मदत
तपासादरम्यान पोलिसांना एक विचित्र गोष्ट लक्षात आली की, एका शेतात काही बैल दोन-तीन दिवसांपासून उपाशीपोटी बांधलेले होते. सहसा बैलांचा मालक त्यांना रोज रात्री घरी घेऊन जात असे, पण या घटनेनंतर बैल तिथेच होते आणि मालक गायब होता. पोलिसांनी या बैलांच्या मालकाचा शोध घेत ते संदीप भलावी नावाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले. तोच या बैलांचा मालक होता. संशयावरुन संदीपला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शेतातील पिकांचे नुकसान आणि जमिनीच्या वादावरुन त्याचे हरोती बाईंशी सतत भांडण व्हायचे, या वादातूनच त्याने तिचा काटा काढण्याचे ठरवले होते.
'असा' केला खून
संदीप भलावीने 6 जानेवारी रोजी हरौती बाईंना डॉक्टरकडे नेण्याच्या बहाण्याने आपल्या दुचाकीवर बसवले. मात्र, त्याने रस्ता बदलून त्यांना एका झोपडीत नेले, तिथे त्यांना बेदम मारहाण करुन त्यांचा गळा दाबून खून केला. सुरुवातीला त्याने मृतदेह झुडपात लपवून ठेवला होता, पण रात्रीच्या वेळी पुन्हा परत येत त्याने मृतदेहावर दगड आणि विटा बांधल्या जेणेकरून तो पाण्यावर तरंगणार नाही आणि मृतदेह गिट्टीच्या खाणीत फेकून दिला. अनेक दिवसांपासून सुरु असलेला जमिनीचा वाद कायमचा मिटवण्यासाठी त्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते.
हे ही वाचा : विवाहित पोलिसासोबत लिव्ह-इन; वाद होताच सर्व्हिस रिव्हॉल्वर घेतली अन्..., तरुणीचा टोकाचा निर्णय
मुख्य आरोपीला अटक
नैनपूर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीपला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध हत्येचा आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पिकांच्या नुकसानीवरुन सुरु झालेल्या वादाचा शेवट अशा प्रकारे हत्येने झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या चातुर्यामुळे आणि शेतात बांधलेल्या बैलांच्या सुगाव्यामुळे एका गुंतागुंतीच्या हत्येचा उलगडा झाला आहे.
ADVERTISEMENT











