Crime News : आपल्या देशात प्रशासनाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. एका व्यक्तीने अटकेपासून वाचण्यासाठी स्वतःला कागदोपत्री मृत घोषित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ताराचंद्र शर्मा असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या संदर्भात न्यायालयात खटला सुरु होता. अटकेची शक्यता निर्माण होताच आणि अजामीनपात्र वॉरंट निघाल्यावर, त्याने 2013 मध्ये महानगरपालिकेद्वारे जारी केलेले एक बनावट मृत्यू प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले. या प्रमाणपत्रात त्याचा मृत्यू 1998 मध्येच झाल्याचे दाखवण्यात आले होते. या खोट्या कागदपत्राच्या आधारे पोलिसांनीही न्यायालयात चुकीचा अहवाल दिला आणि न्यायालयाने त्याच्याविरुद्धची सर्व कायदेशीर कारवाई बंद केली होती. उत्तरप्रदेशातील आग्रा येथील हे प्रकरण आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : गडचिरोली: अबुजमाडच्या जंगलात मोठी चकमक; तीन नक्षलवादी ठार अन् एक जवान शहीद
12 वर्षांनी प्रकरण उघडकीस
जवळपास 12 वर्षे हा आरोपी कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकून सर्वसामान्य आयुष्य जगत राहिला. मात्र नोव्हेंबर 2025 मध्ये एका योगायोगामुळे त्याचे पितळ उघडे पडले. या प्रकरणातील फिर्यादी राजकुमार वर्मा यांनी आरोपीला गांधीनगर परिसरात चक्क स्कूटी चालवताना पाहिले. संशय आल्यावर वर्मा यांनी त्याचे फोटो काढले आणि स्कूटीच्या क्रमांकावरून आरटीओ कार्यालयातून माहिती काढली. तेव्हा धक्कादायक बाब समोर आली की, ज्या आरोपीला न्यायालयाने मृत घोषित केले होते, त्याने 2016 मध्ये आपल्या नावाने नवीन स्कूटीची नोंदणी केली होती आणि तो मोबाईल बँकिंगचाही वापर करत होता. हे सर्व पुरावे गोळा करून फिर्यादीने कोर्टात पुन्हा धाव घेतली.
वडील जीवंत असल्याची वडिलांची कबुली
न्यायालयाच्या आदेशानंतर न्यू आग्रा पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली असता ताराचंद्र शर्मा आपल्या घरात जिवंत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याचे आणि त्याच्या मुलाचे फोटो काढून ते न्यायालयात पुरावा म्हणून सादर केले. चौकशीदरम्यान आरोपीच्या मुलानेही कबुली दिली की, त्याचे वडील जिवंत आहेत आणि वृद्धत्वामुळे ते बहुतेक काळ घरातच असतात. पण कधीकधी बाहेर फिरण्यासाठी स्कूटीचा वापर करतात. सुमारे दशकभर स्वतःचा मृत्यू भासवून न्यायव्यवस्थेची थट्टा करणाऱ्या या आरोपीचे सत्य आता चव्हाट्यावर आले आहे.
हे ही वाचा : अभिनेते राजपाल यादव सरेंडर, थेट तिहार जेलमध्ये रवानगी, असं काय घडलं?
पोलिसांचा निष्काळजीपणा
सध्या पोलिसांनी आपला सविस्तर तपास अहवाल न्यायालयात दाखल केला असून, न्यायालय या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा सुनावणी करत आहे. स्वतःला मृत घोषित करून खटला बंद पाडल्याबद्दल आता ताराचंद्र शर्मावर फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि न्यायालयाची दिशाभूल करणे याअंतर्गत नवीन गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. 12 वर्षांपूर्वी पोलिसांच्या ज्या निष्काळजीपणामुळे हा आरोपी सुटला होता, त्याबाबतही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, प्रशासन यावर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
ADVERTISEMENT











