नाशिक : कथित Love Jihad विवाह सोहळ्याला राजकीय वळण, बच्चू कडूंनी घेतली पीडित कुटुंबाची भेट

मुंबई तक

• 02:31 AM • 17 Jul 2021

नाशिकमधील कथित लव्ह जिहाद प्रकरणाला आता राजकीय वळण लागलेलं आहे. १८ तारखेला नाशिकमधील प्रसाद आडगावकर यांच्या २८ वर्षीय दिव्यांग मुलीचा विवाहसोहळा एका मुस्लीम युवकाशी ठरवण्यात आला होता. या विवाहाची आमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी यात हस्तक्षेप करत हा सोहळा रद्द करण्यास भाग पाडलं. यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी […]

Mumbaitak
follow google news

नाशिकमधील कथित लव्ह जिहाद प्रकरणाला आता राजकीय वळण लागलेलं आहे. १८ तारखेला नाशिकमधील प्रसाद आडगावकर यांच्या २८ वर्षीय दिव्यांग मुलीचा विवाहसोहळा एका मुस्लीम युवकाशी ठरवण्यात आला होता. या विवाहाची आमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी यात हस्तक्षेप करत हा सोहळा रद्द करण्यास भाग पाडलं. यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी आडगावकर कुटुंबाची भेट घेत त्यांना पाठींबा दिला आहे.

हे वाचलं का?

बच्चू कडू यांनी आडगावकर कुटुंबाशी भेट घेऊन कोणालाही न घाबरता मुलीचं लग्न लावा असा विश्वास दिला आहे. हे लग्न लव्ह जिहादचं प्रकरण नाही, त्यामुळे तुम्हाला काही अडचण आली तर मी तुमच्यासोबत उभा असेन अशा शब्दांत बच्चू कडूंनी मुलीचे वडील प्रसाद आडगावकर यांना धीर दिला आहे.

काय आहे हे प्रकरण?

नाशिक येथे राहणाऱ्या प्रसाद आडगावकर यांची २८ वर्षीय दिव्यांग मुलीचा विवाह तिच्यासोबतच शिकणाऱ्या मुस्लीम तरुणाशी ठरला होता. दोन्ही परिवाराची या विवाह सोहळ्याला परवानगी होती. तसेच या प्रकरणात कोणताही धर्म परिवर्तनाचा दबाव नव्हता. दोघेही परिवार लग्नासाठी तयार असल्यामुळे १८ तारखेला हा विवाह सोहळा ठरवण्यात आला.

मे महिन्यात या दोघांचाही कोर्टात नोंदणीकृत विवाह झाला होता. परंतू मुलीच्या घरच्यांना आपल्या मुलीचा विवाह हा रिती-रिवाजानुसार करायचा होता. परंतू या लग्नाची आमंत्रण पत्रिका समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लव्ह जिहादचा मुद्दा चांगलाच गाजायला सुरुवात झाली. समाजातून वाढणाऱ्या दबावामुळे अखेरीस आडगावकर कुटुंबाने हा सोहळा रद्द केला होता.

आडगावकर यांची मुलगी ही मानसिक आजाराने ग्रस्त आहे. आसिफ आणि तिची अनेक वर्षांपासून ओळख होती. आपल्या मुलीला विवाहासाठी योग्य उमेदवार मिळत नसल्यामुळे मुलीच्या वडिलांनी दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने हा सोहळा ठरवला होता. दरम्यान मुलीचे वडील प्रसाद आडगावकर यांनीही समाजाच्या दबावामुळे १८ तारखेचा सोहळा रद्द करण्यात आल्याचं मान्य केलं. परंतु पुढे जाऊन एखादा चांगला मुहूर्त पाहून ते दोघांचंही लग्न लावून देणार आहेत.

    follow whatsapp