त्र्यंबकेश्वर वाद : ‘हे कोत्या वृत्तीची लोक’, राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांवर बरसले

मुंबई तक

20 May 2023 (अपडेटेड: 20 May 2023, 08:48 AM)

त्र्यंबकेश्वर मंदिर वाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावरून भाजपवर टीकास्त्र डागलं. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालावरून राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं.

Trimbakeshwar temple controversy: MNS president Raj Thackeray criticized the BJP, said who wants riots in the state

Trimbakeshwar temple controversy: MNS president Raj Thackeray criticized the BJP, said who wants riots in the state

follow google news

-प्रविण ठाकरे, नाशिक

हे वाचलं का?

त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्यावरून वाद निर्माण झाला. भाजप आध्यात्मिक आघाडीसह काही हिंदूत्ववादी संघटनांनी मुस्लिमांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तर गावकऱ्यांनी ही पारंपरिक परंपरा असल्याचं सांगितलं. त्र्यंबकेश्वर मंदिर वाद आणि राज्यातील काही शहरात घडलेल्या दंगलीच्या घटनांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे तोफ डागली. यावेळी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही पलटवार केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काही कार्यक्रम आखून देणार आहेत. दौऱ्यापूर्वी राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात धूप दाखवण्यावरून उद्भवलेल्या वादावर भूमिका मांडली.

हेही वाचा >> Lok Sabha 2024 : नवनीत राणांविरोधात सुषमा अंधारे उतरणार मैदानात?

राज ठाकरे म्हणाले, “मला असं वाटतं की वर्षानुवर्षांची परंपरा तिकडे चालू असेल, तर ती थांबवण्या अर्थ नाही. हा विषय तिथल्या संस्थान आणि गावकऱ्यांचा आहे. महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं आहेत किंवा मशिदी आहेत, जिकडे वर्षानुवर्षे तिथे हिंदू मुस्लीम सख्य दिसतं.”

भ्रष्ट व्हायला धर्म इतका कुमकूवत आहे का? ठाकरेंचा सवाल

“माहीमचा जो दर्गा आहे मगदूम बाबाचा… त्या ऊरुसाला जी चादर चढवली जाते, त्यावेळी माहीम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल ती चढवतो. महाराष्ट्रातील अशी अनेक उदाहरण काल परवा माझ्याकडे आली. मला असं वाटतं की त्या गोष्टी तुम्ही चालू ठेवल्या पाहिजे. इतर धर्माचा एखादा माणूस जर मंदिरात आला, तर इतका भ्रष्ट होणारा, इतका कमकुवत धर्म आहे का?”, असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

“मीही अनेक दर्ग्यांमध्ये गेलोय. मशिदींमध्ये गेलोय. अनेक मुस्लीम लोक जेव्हा मंदिरात येतात. उलट आपल्याच काही मंदिरात असं आहे की, काही जातींनाच फक्त दर्शनासाठी गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. या गोष्टींकडे बघणाऱ्या लोकांची वृत्ती ही कोती आहे, छोटी आहे”, असं म्हणत राज यांनी भाजपला लक्ष्य केलं.

राज ठाकरे म्हणाले, “दंगली कुणाला हव्यात का?”

भाजप आध्यात्मिक आघाडी आणि इतर काही हिंदूत्ववादी संघटनांनी धूप दाखवण्यात आलेल्या ठिकाणाचं शुद्धीकरण केलं. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “त्र्यंबकेश्वरमधील गावकऱ्यांनी या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे. बाहेरच्यांनी यात पडायची काही गरज नाही. यात कुणाला दंगली हव्यात का? ज्या गोष्टी चुकीच्या घडतील, तिथं प्रहार करणं गरजेचं. मी लाऊडस्पीकरचा विषय काढला. समुद्रातील अनधिकृत दर्ग्याबद्दल बोललो. त्या केल्याच पाहिजेत. जाणून बुजून काहीतरी खोदून काढण्याला काही अर्थ नाहीये.”

“आतापर्यंतचा महाराष्ट्रातील इतिहास बघितला तर जिकडे मराठी मुस्लीम राहतात, तिथे कधी दंगली होत नाहीत. कारण अनेक वर्षांपासून, अनेक पिढ्यांपासून ते इथं राहिलेले आहेत. त्यांचं काम, पोरंबाळ इकडे असतात, ते मराठीत बोलतात. तिकडे असलेलं सामंजस्य काही लोकांनी बिघडवू नये”, असं राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> Karnataka : ‘हे’ 5 फॅक्टर अन् सिद्धरामय्या डीके शिवकुमार यांना ठरले वरचढ

राज्यात काही ठिकाणी दंगली घडल्या. या दंगलीनंतर भाजपच्याच लोकांनी आंदोलनं केली, या मुद्द्यावर राज ठाकरे म्हणाले, “ही गोष्ट मला समजलीच नाही. बहुसंख्य हिंदू असलेल्या राज्यामध्ये जर समजा हिंदू खतरे मैं असेल, तर कसं होईल? मला वाटतं निवडणुका जसजशा जवळ येतील, तसे हे प्रसंगही वाढत जातील”, असं विधानही राज ठाकरे यांनी केलं.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल… ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीकास्त्र डागलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं. हाच मुद्दा उपस्थित करत राज ठाकरे म्हणाले, “मी कर्नाटक निवडणुकीच्या बाबतीत जेव्हा माझी प्रतिक्रिया दिली. ती त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, इतरांनी कुणी आम्हाला प्रतिक्रिया देऊ नये, मग उद्या वर्तमानपत्राचे अग्रलेख पण लिहायला नको तुम्ही. याच्या बाबतीत कुणी बोलायचंच नाही का? हे कुणाच्याही बाबतीत बोलणार”, असं म्हणत राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला.

    follow whatsapp