मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई तक बैठकीत विविध राजकीय मुद्द्यांवर आपली रोखठोक मतं मांडली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना विरोधी पक्षनेते म्हणून केलेल्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षात होते, तेव्हा त्यांनी अत्यंत प्रभावी काम केले आहे. ते विरोधी पक्षात असताना सरकारची एखादी चूक किंवा गोष्ट इतकी मोठी करून दाखवायचे की, सत्तेत बसलेल्या लोकांनाही त्याचे आश्चर्य वाटायचे."
ADVERTISEMENT
मात्र, यासोबतच फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, "फडणवीस हे पेशाने वकील आहेत. त्यामुळे ते अशी काही विधाने करतात, ज्यातून त्यांना नंतर सोयीस्करपणे 'यू-टर्न' घेता येतो. त्यांना शब्दांचा खेळ फार उत्तम जमतो."
'आमचा पक्ष फुटणार नाही'
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात फूट पडणार का? यावर उत्तर देताना त्यांनी पक्षात कोणतेही 'ऑपरेशन' होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आणि आमचा पक्ष फुटेल असे आपल्याला वाटत नसल्याचे स्पष्ट केले. विरोधकांच्या आंदोलनांविषयी बोलताना त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा दाखला दिला. आमच्या आंदोलनामुळेच आज कांदा 30 रुपये किलो झाला आहे, असे सांगत त्यांनी आगामी काळात सर्व विरोधकांनी एकत्रितपणे पुढे जाणे गरजेचे असल्याचे मत मांडले. तसेच, विधानसभा अधिवेशनात विरोधकांचे प्रश्न मुद्दाम मागे ठेवले जातात, त्यामुळे आपल्याला अजून जास्त आक्रमक होण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा>> Mumbai Tak Baithak: ठाकरेंची शिवसेना कायम का फुटते? आदित्य ठाकरे म्हणाले...
'जनतेचा विश्वास कमी झालाय'
सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे जनतेचा नेत्यांवरून विश्वास उडत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. "लोकांचा सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांवरचा विश्वास कमी झाला आहे, म्हणूनच लोक आंदोलनात उतरताना दिसत नाहीत. पण आम्ही सातत्याने लोकांसाठी लढत राहू. याला थोडा वेळ लागेल, पण जनतेकडून नक्कीच प्रतिसाद मिळेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?
अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकत्र येणार का? यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. कारण मतविभाजनाचा थेट फायदा अप्रत्यक्षपणे भाजपलाच होतो आणि मते फुटू नयेत ही आजची गरज आहे. याच संदर्भात बोलताना त्यांनी नाव न घेता विरोधकांवर टीका केली की, "मंत्री बनणे सोपे आहे, पण नेता बनणे अवघड आहे. सुनेत्रा पवार यांनी स्वतः ठरवावे की त्यांना नेता बनायचे आहे का? जे आज सत्तेत जात आहेत, त्यांच्यामध्ये जनतेसाठी लढण्याची ताकद उरलेली नाही."
हे ही वाचा>> Mumbai Tak Baithak: 'तू ये इकडे.. तुला मंत्री बनवतो..', कोणत्या NCP नेत्याने दिलेली मुनगंटीवारांना ऑफर?
काँग्रेसमध्ये विलीन होणार का?
राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का? या राजकीय चर्चेला त्यांनी पूर्णपणे पूर्णविराम दिला. पक्षात विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही आणि तसा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, " समाजवादी पक्षाच्या आमदार, खासदारांची संख्या वाढू शतके. तर आमच्या आमदारांची संख्या वाढू शकते. पण जर आपण निवांत राहिलो तर ती कमीही होईल. जर महाविकास आघाडीच्या पक्षात आपापसात सुसंवाद असेल आणि एकमेकांच्या जागा ओरबाडण्याचा प्रयत्न केला नाही, तर आपण सर्वजण अत्यंत व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकतो."
ADVERTISEMENT











