'सकाळी मला मेसेज पाठवला...', विश्वासू सहकाऱ्याने साथ सोडल्यानंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले?

Aaditya Thackeray on Sachin Ahir : वरळी मतदारसंघाती विश्वासू सहकारी आणि विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray

मुंबई तक

30 Jun 2026 (अपडेटेड: 30 Jun 2026, 03:02 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'सकाळी मला मेसेज पाठवला होता...',

point

विश्वासू सहकाऱ्याने साथ सोडल्यानंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले?

Aaditya Thackeray on Sachin Ahir, मुंबई : ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना विधानपरिषदेच्या उपसभापतीची उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीतून आदित्य ठाकरेंच्या अडचणी कमी व्हाव्यात, यासाठी शिवसेनेने सचिन अहिर यांना गळाला लावलं होतं. सचिन अहिर यांना शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विधानपरिषद देण्यात आली होती. मात्र, आता 7 वर्षांनंतर त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. दरम्यान, सचिन अहिर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी तीव्र प्रतिक्रिया दिलीये. ते काय म्हणाले? जाणून घेऊयात.. 

हे वाचलं का?

सचिन अहिर यांच्याबाबत आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया 

आदित्य ठाकरे म्हणाले, हे ऑपरेशन टायगर मुळीच नाहीये. हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. त्याचा हा परिणाम आहे. सकाळी त्यांनी (सचिन अहिर) मला मेसेज पाठवला होता की मी निवडणुकीत उभा राहणार नाही. पण या सर्व बोलण्याच्या गोष्टी असतात. भाजपने राम मंदिर बनवू म्हणून असंख्य कार्यकर्त्यांना रस्त्यावर आणलं होतं. आंदोलन करावे लागले. आमच्या सारखे पक्ष सोबत होते. तेच आज राम मंदिर लुटत आहेत. उपसभापतीपदासाठी भाजपचा कार्यकर्ता का नाही? हा सवाल माझा आरएसएस आणि भाजपला आहे. सचिन अहिर यांच्याविरोधात योग्य ती कारवाई केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. मात्र, भाजप कार्यकर्त्यांना सत्तेपासून दूर का ठेवले जाते? असा सवालही आदित्य ठाकरेंनी केला. 

हेही वाचा : मोठी बातमी: पुन्हा एकदा राजकीय भूकंप.. शिंदे काही थांबेनात, उद्धव ठाकरेंचा 'तो' आमदार फोडला अन् थेट...

 ज्यांना ज्यांना आम्ही शब्द दिला होता. तो आम्ही पाळला होता. आम्ही शब्द पाळणारे आहोत. तुमच्याकडून निष्ठा पाळली जाते की नाही? हा तुमचा प्रश्न आहे. आम्हाला सोबत राहाण्याचा शब्द दिला होता. तो तुम्ही पाळला नाहीत.  तुमची परिस्थिती काय होती? तुम्हाला आमदार केले, तुमच्या मुलीला समितीमध्ये स्थान दिले, भावाला बेस्ट समितीवर संधी दिली, तर नैतिकतेच्या आधारावर तुम्ही तुमच्या पक्षासोबत राहायला हवे. इतकीही नैतिकता कशी नसू शकते? काही लोक असे असतात, ज्यांचे मन बदलते. ते कोणते कारण देणार? चला, आपण चर्चा करूयात. आमच्याकडून नेमकी कोणती उणीव राहिली. त्यांना इथे बोलावले जावे. आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारे नाही, तर संविधानावर विश्वास ठेवणारे लोक आहोत, असंही आदित्य ठाकरेंनी नमूद केलं.

हेही वाचा :  17 वर्षांच्या पुतण्यासोबत ठेवायची शारीरिक संबंध, गर्भवती चुलतीला आता भलतीच आस

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले,टीएमसीसोबत आज जे घडत आहे, तेच यापूर्वी आमच्यासोबत घडले होते. आमच्या प्रकरणात वेळेत न्याय मिळाला असता, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. हा केवळ राजकीय पक्षांचा विषय नाही, तर संपूर्ण संविधानाशी संबंधित प्रश्न आहे. भाजप संविधानाचा अपमान करत आहे. न्यायव्यवस्थेने संविधानाचा सन्मान राखावा, हीच आमची अपेक्षा आहे. हे 'ऑपरेशन टायगर' नाही, तर 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस' आहे. कदाचित हे देवेंद्र फडणवीस यांचे शेवटचे अधिवेशन ठरू शकते. त्यांना आता केंद्रीय मंत्रिमंडळात पाठवले जाऊ शकते.

आदित्य ठाकरेंचे भाजपला सवाल 

2029 ची निवडणूक भाजपसाठी सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. भाजपने आम्हा सर्वांना सोबत घेऊन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण केले. भाजपने दंगली घडवल्या. राम मंदिराचा मुद्दा पुढे करून रथयात्रा काढली. पण त्याच भाजपचे लोक अयोध्येत जमिनीच्या व्यवहारात गैरव्यवहार करत आहेत, घोटाळे करत आहेत. आज या भाजपकडून कोणतीही अपेक्षा उरलेली नाही. त्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून उज्जैनमध्ये मास्टर प्लॅनमध्ये फेरफार करून भ्रष्टाचार केला जात आहे. आज भाजपसोबत बसलेल्या सर्व आमदार आणि खासदारांना मी एवढेच सांगू इच्छितो की, येत्या संसदीय अधिवेशनात त्यांनी भाजपला विचारावे की, उज्जैनमध्ये भ्रष्टाचार कसा झाला? अयोध्येत नेमका कोणता भ्रष्टाचार झाला? घोटाळा का करण्यात आला? हिंदूंच्या भावना का दुखावल्या गेल्या? आज भाजपमध्ये जाण्याची इच्छा बाळगणाऱ्यांनाही मी एक प्रश्न विचारू इच्छितो. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्याच मोठ्या नेत्यांना भाजपने खासदार केले, मंत्री केले. भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्याचा दावा करणारी हीच का ती जुनी भाजप आहे? असे सवाल आदित्य ठाकरेंनी केले आहेत.