Sanjay Raut on Sachin ahir, मुंबई : विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या सचिन अहिर यांना शिंदे यांच्या शिवसेनेकडून थेट विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. तसेच अहिर यांच्या जाण्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मोठी बातमी: पुन्हा एकदा राजकीय भूकंप.. शिंदे काही थांबेनात, उद्धव ठाकरेंचा 'तो' आमदार फोडला अन् थेट...
संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
या घडामोडीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर सूचक शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये, "आम्ही चार किरणांचीही आस का धरावी? जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी? (पक्षात येतानाच जे स्वार्थ आणि बेईमानीचा कीडा घेऊन येतात त्यांच्या जाण्याचे दुःख का करावे)" असे म्हटले आहे. राऊत यांच्या या पोस्टची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत असून हे ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.
हेही वाचा : 'पीएम मोदी अन् त्यांचं मंत्रिमंडळ अवाक्षर...', राम मंदिरातील अपहारावरुन ठाकरेंची पोस्ट
कोण आहेत सचिन अहिर ?
सचिन अहिर हे कामगारांचे नेते म्हणून ओळखले जातात. 1999 मध्ये त्यांनी शिवडी मतदारसंघातून प्रथमच आमदार म्हणून विजय मिळवला. त्यानंतर 2004 मध्ये पुन्हा त्याच मतदारसंघातून ते निवडून आले. पुढे 2009 मध्ये त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्याकडे गृहनिर्माण राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती.
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये सचिन अहिर यांचाही समावेश होता. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, आता तब्बल सात वर्षांनंतर त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाची आणि त्यावर उमटलेल्या संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेची राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT











