Raj Thackeray and Babasaheb Purandare: ‘…तर महाराष्ट्रात तांडव करेन’, तेव्हा राज ठाकरे असं का म्हणाले होते?

मुंबई तक

• 02:29 AM • 15 Nov 2021

मुंबई: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचं नातं आहे. खरं पाहिलं तर राज ठाकरे यांची बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. जेव्हा कधीही बाबासाहेब पुरंदरे हे राज ठाकरे यांची आठवण काढत तेव्हा-तेव्हा राज ठाकरे हे विलंब न करता थेट पुणं गाठायचे. एवढंच नव्हे तर राज ठाकरे हे कधीही पुण्यात गेल्यानंतर […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचं नातं आहे. खरं पाहिलं तर राज ठाकरे यांची बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. जेव्हा कधीही बाबासाहेब पुरंदरे हे राज ठाकरे यांची आठवण काढत तेव्हा-तेव्हा राज ठाकरे हे विलंब न करता थेट पुणं गाठायचे.

हे वाचलं का?

एवढंच नव्हे तर राज ठाकरे हे कधीही पुण्यात गेल्यानंतर सर्वप्रथम बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घ्यायचे. त्यामुळेच जेव्हा बाबासाहेबांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराला महाराष्ट्रातूनच विरोध झाला होता तेव्हा राज ठाकरे यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता.

बाबासाहेब पुरंदरे यांना 2015 साली तत्कालीन फडणवीस सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केल्यानंतर त्यांना राष्ट्रावादी काँग्रेसने प्रचंड विरोध केला. काही संघटनांनी तर त्यांचा पुरस्कार सोहळाच उधळून लावण्याचा इशारा दिला होता. ज्यानंतर राज ठाकरे अत्यंत आक्रमकपणे निषेध करणाऱ्यांना मनसे स्टाइल इशारा दिलेला.

‘जर बाबासाहेब पुरंदरे यांना हात जरी लागला तरी याद राखा मी महाराष्ट्रात तांडव करेन’, असं राज ठाकरे म्हणाले होते.

पाहा त्यावेळी राज ठाकरे नेमकं काय-काय म्हणाले होते, पवारांना का साधलेला निशाणा?

‘बाबासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास विरोध करण्यामागे शरद पवार तसेच भाजपमधील काही मंत्री आहेत जे गलिच्छ राजकारण करत आहे.’ असा आरोप राज ठाकरेंनी केला होता.

बाबासाहेब पुरंदरे यांचा पुरस्कार समारंभ उधळून लावण्याची धमकी देण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांनी पुरंदरेंच्या बाजूने ठामपणे उभं राहत विरोधकांना थेट आव्हान दिलं होतं.

‘राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपमधीलच काही मंत्री यांनी मिळून हे विरोधाचं राजकारण सुरु केलं आहे. मला काही देवेंद्र फडणवीस यांची बाजू घ्यायची नाही. पण ते मुख्यमंत्री झाल्यापासून हे राजकारण सुरू आहे. शरद पवार यांना भाजपमधील कोण-कोणते मंत्री सामील आहेत ते मला महित आहेत. फडणवीस पक्षात ज्युनियर आहेत. तसेच ते ब्राम्हण आहेत. म्हणूनच हे राजकारण सुरु आहे.’ असं म्हणत राज ठाकरेंनी याबाबत उघडउघड हल्लाबोल केला होता.

‘केवळ एखाद्या वाक्यासाठी जे शिवचरित्र लिहण्यात आलं आहे त्यावर आक्षेप घेणं काही बरोबर नाही. जे आक्षेप आहेत त्यावर खुली चर्चा केली जाऊ शकते. त्यासाठी राजकीय गदारोळ करण्याची गरज नाही.’ असंही राज ठाकरे यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

‘बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांनी बाबासाहेबांचं अभिनंदन केलं होतं. अजित पवार यांनीही आपण बाबासाहेबांचं आदर करतो म्हटलं होतं. अशावेळी अचानक हे घुमजाव का करण्यात आला?’, असा सवाल विचारत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता.

‘शरद पवारांच्या राजकारणामुळेच जितेंद्र आव्हाड यांची बाबासाहेब पुरंदरेंबाबत बोलण्याची एवढी हिम्मत झाली आहे. पवारांनीच आव्हाड यांना फूस लावलेली आहे. त्यामुळे माझ्या आजोबांच्या पुस्तकातील दाखले आव्हाडांनी देऊ नयेत.’ असं राज ठाकरे यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

Babasaheb Purandare: बाबासाहेब पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ देण्यावरून का झाला होता वाद, कोणी केला होता विरोध?

दरम्यान, त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांच्या समर्थनार्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात मनसे रस्त्यावर देखील उतरली होती. त्यावेळी शरद पवारांचे पुतळे देखील मनसैनिकांकडून जाळण्यात आले होते.

    follow whatsapp