मुंबई: मुंबईतील क्रूझवरील ड्रग्स पार्टी छाप्यादरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या टीमने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना अटक केली. परंतु या संपूर्ण प्रकरणात तीन लोक असे आहेत की जे आता NCB साठी डोकेदुखी ठरु शकतात. कारण या लोकांपैकी एक व्यक्ती तो आहे की, ज्याने या प्रकरणाची माहिती दिली होती. याच माहितीच्या आधारे एनसीबीने ही छापेमारी केली होती. तर दोन लोक असे आहेत की, ज्यांच्यामुळे आता NCB च्या कामकाजावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ADVERTISEMENT
आता या संपूर्ण प्रकरणात भोपाळ कनेक्शन समोर येत आहे. कारण भोपाळचा रहिवासी नीरज यादव यानेच क्रूझवरील रेव्ह पार्टीची माहिती दिली असल्याचं बोललं जात आहे. नीरज यादव यांची ओळख मनिष भानुशाली आणि केपी गोसावी यांच्याशी देखील आहे. यांचेच काही फोन कॉल आणि व्हीडिओ आता समोर आले आहेत. भानुशाली आणि गोसावी ही ती दोन माणसे आहेत जी क्रूझवरील छाप्यादरम्यान आर्यन खान आणि अरबाज मर्चंटला हाताला धरुन घेऊन NCB कार्यालयात घेऊन जात असताना दिसले होते.
NCB च्या छापेमारीत हे दोघे जण सामील झाल्याने आता या कारवाईबाबत बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी सवाल उपस्थित केले तेव्हा मात्र, एनसीबीने दोघांबद्दल स्पष्टीकरण देताना सांगितलं की, हे दोघं या प्रकरणात स्वतंत्र साक्षीदार आहेत.
फोन कॉलचा पुरावा
दरम्यान, या दोघांशी संबंधित आणखी काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. नीरज यादव याच्या म्हणण्यानुसार, त्याने 1 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 च्या सुमारास मनिष भानुशालीला फोन केला होता आणि 2 ऑक्टोबरला मुंबईत एका जहाजावर रेव्ह पार्टी आयोजित केली जाणार असल्याची माहिती दिली होती.
नीरजने यावेळी 27 लोकांची नावे मनिष भानुशालीलाही पाठवली होती. जे ड्रग्स पार्टीत जाणार होते. भानुशालीला केलेल्या फोन कॉलचे पुरावेही नीरजकडे आहेत. भानुशालीने नीरजला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून तो मुंबईला जात असल्याचे सांगितले होते.
नीरजच्या मते, भानुशाली आणि गोसावी त्यावेळी अहमदाबादमध्ये होते आणि मुंबई सोडण्याआधी त्याने त्याला सांगितले की तो NCB च्या लोकांशी बोलला आहे. भानुशाली स्वत:ला भाजपचा कार्यकर्ता असल्याचं सांगत आहे. तसेच नीरजसोबत मनिष भानुशालीचे अनेक फोटोही आहेत. ज्यामध्ये दिल्लीतील भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयाच्या बाहेर देखील दोघांचा एक फोटो आता समोर आला आहे. ज्यामध्ये भानुशाली मीडियाशी बोलत आहे आणि नीरज यादव त्याच्या शेजारी उभा आहे.
2 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.14 वाजता नीरज यादवने पुन्हा भानुशालीला फोन केला. ज्यावरून त्याला कळले की भानुशाली आणि गोसावी हे दोघेही मुंबईत पोहचले आहेत. 10 वाजून 16 मिनिटांनी नीरजने पुन्हा भानुशालीला फोन केला. त्यावेळी नीरजला सांगण्यात आले की, NCB चे 25 लोक त्याच्यासोबत उपस्थित आहेत. यावेळी भानुशालीच्या बोलण्यावर नीरजचा विश्वास बसत नव्हता. नीरजने पुन्हा एकदा रात्री 10.52 वाजता भानुशालीला फोन केला. पुरावा देण्यासाठी भानुशालीने नीरजला सकाळी 10:53 वाजता व्हिडिओ कॉल केला. जे नीरज यादवने रेकॉर्ड केले होते.
क्रूझच्या बाहेरून व्हीडिओ कॉल
व्हीडिओ कॉल क्रूझच्या बाहेरून करण्यात आला होता आणि भानुशालीने नीरजला अंगठा दाखवून इशारा केला की, सारं काही त्यांच्या हिशोबाने चालू आहे. यानंतर भानुशालीने नीरजला एका पाठोपाठ एक असे अनेक फोन केले. कारण नीरजने त्यांना जी नावं पाठवली होती त्यापैकी कोणीही क्रूझवर आलेले नव्हते.
त्यावेळी भानुशालीला अशी काळजी वाटत होती की, नीरजने पाठवलेली माहिती ही चुकीची ठरू नये. यानंतर संध्याकाळी 5 वाजून 14 मिनिटांनी भानुशालीने नीरजला फोन केला आणि सांगितले की 27 पैकी 9 रन घेतल्या आहेत. म्हणजे 27 पैकी 9 लोक पकडले गेले आहेत. नीरजने हा कॉलही रेकॉर्ड केला.
यानंतर, भानुशालीने 7 वाजून 41 मिनिटांनी नीरज यादवला दुसरा फोन केला. ज्यात त्याने सांगितले की, शाहरुख खानचा मुलगाही पकडला गेला आहे. नीरजने हा कॉल पण रेकॉर्ड केला. वास्तविकता अशी आहे की, या स्टोरीमध्ये अनेक ट्विस्ट आहेत.
SRK’s Son: आर्यन खानला जामीन मिळू नये म्हणून NCB ने आखली नवी रणनीती
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, नीरज यादवच्या मते त्याला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानबद्दल कोणतीही माहिती नव्हती. एनसीबीला शाहरुखच्या मुलाकडे कोणत्याही प्रकारचं ड्रग्स सापडलेलं नाही. मग सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो की, शाहरुख खानच्या मुलाला या प्रकरणात गोवले जात आहे का? या छाप्यामागचा नेमका उद्देश काय आहे? यासारखे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत आणि ज्याची उत्तरं मिळणं अद्यापही बाकी आहे.
ADVERTISEMENT