आर्यन खानचं अपहरण खंडणीसाठी झाल्याचं हायकोर्टाच्या ‘त्या’ आदेशाने स्पष्ट केलं, नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई तक

• 03:53 PM • 20 Nov 2021

आर्यन खानचं अपहरण खंडणीसाठी झाल्याचं हायकोर्टाने दिलेल्या आदेशामुळे स्पष्ट झालं असा आरोप आता नवाब मलिक यांनी केला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही. एनसीबीने केलेली कारवाई म्हणजे सगळा बनाव होता. आज हायकोर्टाने जी आदेशाची प्रत दिली आहे त्यावरून हे स्पष्ट झालं आहे असा आरोप आता नवाब मलिक यांनी केला आहे. आज […]

Mumbaitak
follow google news

आर्यन खानचं अपहरण खंडणीसाठी झाल्याचं हायकोर्टाने दिलेल्या आदेशामुळे स्पष्ट झालं असा आरोप आता नवाब मलिक यांनी केला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही. एनसीबीने केलेली कारवाई म्हणजे सगळा बनाव होता. आज हायकोर्टाने जी आदेशाची प्रत दिली आहे त्यावरून हे स्पष्ट झालं आहे असा आरोप आता नवाब मलिक यांनी केला आहे. आज हायकोर्टाने एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या निकालानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या कारवाईवर आरोप केला आहे.

हे वाचलं का?

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांना का मिळाला जामीन? काय म्हणालं बॉम्बे हायकोर्ट?

काय म्हणाले नवाब मलिक?

‘मी सुरुवातीपासून सांगितलं होतं की आर्यन खानचं अपहरण हे खंडणीसाठी करण्यात आलं होतं. आता कोर्टाच्या आदेशावरून हे स्पष्ट झालं आहे. आता समीर वानखेडे सुप्रीम कोर्टात धाव घेतील. पण मी एनसीबीला सांगू इच्छितो की हे पैसे जनतेचे आहेत. रिया चक्रवर्ती प्रकरणातही एनडीपीएस कोर्टाने जामीन दिल्यावर हायकोर्टात धाव घेतली होती. जनतेच्या पैशांची उधळपट्टी एनसीबीने थांबवली पाहिजे’ असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

कोर्टाने काय म्हटलं आहे?

आता कोर्टाने आज जो आदेश जारी केला आहे त्यामध्ये जामीन का मंजूर करण्यात आला ते आला ते स्पष्ट केलं आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यात अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे करण्याचा कट रचल्याचा कोणताही सकारात्मक पुरावा नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने आज जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. षडयंत्र किंवा कट रचल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. व्हॉट्स अॅप चॅटमध्ये काहीही आक्षेपार्ह नव्हतं असंही यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांच्यात कट रचला गेला होता हे सिद्ध करण्यासाठी NCB सकारात्मक पुरावे गोळा करण्यात आणि परिस्थितीजन्य पुरावे दाखवण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळेच या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट हे एखाद्या व्यावसायिकाप्रमाणे ड्रग्जच्या गुन्हा सामील आहेत हे या टप्प्यावर सांगणं कठीण आहे. त्यांनी गुन्हेगारी कट रचला असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही असंही कोर्टाने त्यांच्या आदेशात म्हटलं आहे.

कोर्टाने नेमकं काय म्हटलं आहे वाचा हे महत्त्वाचे मुद्दे

आरोपी क्रमाकं एक आर्यन खान याच्या व्हॉट्स अॅप चॅटमधून आक्षेपार्ह असं काहीही सापडलेलं नाही. त्याच्या चॅटवरून हे कुठेही सिद्ध होत नाही की तो मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांच्यासोबत कट रचत होता.

या प्रकरणात मुनमुन धमेचा, अरबाझ मर्चंट आणि आर्यन खान या तिघांनाही एक गुन्हा करायचा होता याचे कोणतेही सबळ किंवा ठोस पुरावे आढळून येत नाहीत.

आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांची वैद्यकीय चाचणीही झाली नव्हती की ज्यावरून हे समजेल की त्यांनी छापा पडला तेव्हा ड्रग्ज घेतले होते की नव्हते.

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट हे क्रूझमधून प्रवास करत होता. फक्त या गोष्टीचा हवाला देऊन त्यांच्या विरोधात सेक्शन 29 लावता येणार नाही.

    follow whatsapp