हनुमान चालीसाचा मुद्दा सध्या राज्यात आणि खासकरून मुंबईत चांगलाच गाजतो आहे. अपक्ष आमदार रवी राणा आणि अपक्ष खासदार नवनीत राणा या दोघांनी मुंबईतल्या मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर येऊन हनुमान चालीसा म्हणणार हे जाहीर केलं होतं. काल रात्री त्यांना उशिरा अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT
या अटकेनंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात आमदार रवी राणा यांनी रात्रभर १०१ वेळा हनुमान चालीसा पठण केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक केल्याप्रकरणी सांताक्रुझ पोलीस स्टेशनच्या कोठडीत रात्रभर १०१ वेळा हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. अशी माहिती आमदार रवी राणा यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. त्यानुसार ते मुंबईतही आले होते. पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. मात्र, नवनीत राणा आणि रवि राणा आपल्या भूमिकेवर ठाम होते.
शनिवारी बराच गदारोळ झाला. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या घराबाहेर जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होतं. त्यामुळे बराच गदारोळ निर्माण झाला होता. दरम्यान, सायंकाळी खार पोलिसांनी १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली होती. त्यानंतर आता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.
“महाराष्ट्राच्या शांतीसाठी आजचा बजरंगबलीचा दिवस आहे. हनुमानाचा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्राला लागलेला हा शनि आजच्या दिवशी संपवायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात उन्नती झाली, या उद्देशासाठी जर आमचा विरोध होत असेल. मराठी व्यक्तीला हनुमान चालीसा वाचण्यापासून रोखलं जातंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. सत्तेचा दुरुपयोग होतोय.” असं म्हणत त्यांनी शिवसेनेला आव्हान दिलं होतं. मात्र नंतर त्यांनी हा हट्ट सोडला. नंतर बराच गदारोळही झाला. ज्यानंतर १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल करून राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली. अशात आमदार रवी राणा यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात १०१ वेळा हनुमान चालीसा म्हटली आहे असं ट्विट केलं.
रवी राणा आणि नवनीत राणा या दोघांनाही अमरावतीतच रोखण्याचा प्रयत्न होणार होता. मात्र गनिमी कावा करत २२ तारखेलाच हे दोघं मुंबईत आले. तेव्हापासून शिवसेना विरूद्ध राणा दाम्पत्य असा संघर्ष पाहण्यास मिळत होता. या दोघांनीही हनुमान चालीसा म्हणण्याचा हट्ट सोडल्यानंतरही त्यांना अटक करण्यात आली. आता हे सगळं प्रकरण कोणत्या दिशेने जातं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT