‘अशा लोकांना पक्षाने कापून फेकून दिलं पाहिजे’; उदयनराजे भोसलेंच्या संतापाचा कडेलोट

मुंबई तक

• 03:27 AM • 21 Nov 2022

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानामुळे भाजपवर टीका होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल करण्यात आलेल्या विधानाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. या प्रकरणात आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वशंज असलेल्या उदयनराजे भोसलेंनीही उडी घेतली असून, पंतप्रधान मोदींकडे भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवण्यात यावं, अशी मागणी केलीये. संतापलेल्या उदयनराजे भोसले यांनी […]

Mumbaitak
follow google news

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानामुळे भाजपवर टीका होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल करण्यात आलेल्या विधानाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. या प्रकरणात आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वशंज असलेल्या उदयनराजे भोसलेंनीही उडी घेतली असून, पंतप्रधान मोदींकडे भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवण्यात यावं, अशी मागणी केलीये.

हे वाचलं का?

संतापलेल्या उदयनराजे भोसले यांनी भगतसिंह कोश्यारींची अक्कलच काढली. तर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींना भिकारडा म्हणत सुनावलंय. गँगरीन झाल्यावर जसा शरीराचा भाग कापून टाकतात, तसंच ह्या लोकांना पक्षाने कापून फेकून द्यावं, अशी भूमिका मांडत उदयनराजेंनी पंतप्रधान मोदींकडे मागणी केलीये.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या विधानावर उदयनराजे भोसले काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, “कोण काय म्हणतंय यापेक्षा प्रत्येक पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय स्वतःच्या समाजकार्याला, वाटचालीला सुरू करत नाही. आज महाराष्ट्रात काय सुरूये. राज्यपाल पद सन्मानाचं पद आहे. सन्मानाच्या पदावर विराजमान असतात, निदान त्या माणसाला अक्कल पाहिजे, कळायला पाहिजे. एक-दोनदा त्यांनी हे केलंय”, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केलीये.

राज्यपालांच्या बोलण्याचे वेगळे अर्थ काढण्यात आले : वादावर फडणवीस आणखी काय म्हणाले?

उदयनराजे भोसले सुधांशू त्रिवेदींना म्हणाले ‘भिकारडा’

“तो सुधांशू त्रिवेदी… कुठला तो भिकारडा. टुकार. अशा लोकांनी काहीपण शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं? माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळकळीची विनंती आहे की, आपल्या माध्यमातून देशात विकासकामांची वाटचाल होत असताना या अशा दोन लोकांमुळे गालबोट लागत असेल, तर या दोघांना माफी मागायला लावा. प्रवक्ता सुधांशू त्रिवेदीला पक्षातून काढून टाका. या राज्यपालाला खाली ओढून त्याला लांब कुठेतरी फेकून द्या”, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

छत्रपतींवरील वादग्रस्त वक्तव्यांनंतर अमोल कोल्हे संतापले : नेमकं खुपतयं काय? भाजपला सवाल

“ही एक प्रकारची विकृती आहे. विकृतीला कुठला पक्ष नसतो. जात नसते. जेव्हा गँगरीन होतं, तेव्हा शरीराचा तो भाग कापून टाकतात. अशा लोकांना पक्षाने कापून फेकून दिलं पाहिजे”, असं म्हणत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल करण्यात आलेल्या विधानांवर संताप व्यक्त केलाय.

उदयनराजे भोसले अमित शाहांकडे करणार कोश्यारी आणि त्रिवेंदींची तक्रार

“भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य करण्यापूर्वी शिवरायांचा इतिहास वाचायला हवा होता. कोश्यारींनी अशाप्रकारचे वक्तव्य करण्याची ही काही पहिली वेळ नाही. त्यांनी यापूर्वी अनेकदा शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. यासंदर्भात भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र देणार आहे”, असं छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितलं.

    follow whatsapp