Crime News : एका भाडेकरुने आपल्याच घरमालकाच्या 8 वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करुन तिची निर्घृण हत्या केली आहे. प्रज्ञा असे मृत मुलीचे नाव आहे. चिमुरडीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह आरोपीने घरातील पिठाच्या डब्यात सपवून ठेवला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेशातील आग्र्यातील सिद्धार्थ नगर परिसरातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
घराच्या भाड्यावरुन वाद
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश कुमार यांच्या घरात सुनील कुमार नावाचा तरुण गेल्या काही महिन्यांपासून भाड्याने राहत होता. तो दिनेश यांच्याच बुटाच्या कारखान्यात कामही करायचा. सुनीलने गेल्या काही महिन्यांपासून घराचे भाडे दिले नव्हते, ज्यावरून वाद सुरू होता. मंगळवारी सायंकाळपासून प्रज्ञा अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती न सापडल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला असता सुनीलच्या हालचालींवर संशय आला. त्याच्या खोलीची झडती घेतली असता, पिठाच्या डब्यात प्रज्ञाचा मृतदेह आढळून आला.
हे ही वाचा : मर्सिडीज गाडी, 21 देशात भ्रमण, फार्म हाऊसवर टर्किश किचन अन् फर्निचर; अशोक खरातने व्यावसायिकाला किती लुटलं?
आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी
या क्रूर घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक रहिवासी आणि प्रज्ञाच्या नातेवाईकांचा संयम सुटला. संतप्त जमावाने रास्ता रोको करून जोरदार निदर्शने केली. यावेळी काही वाहनांची तोडफोड करण्यात आली असून आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात येत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून डीसीपी सिटी अली अब्बास यांच्यासह मोठा पोलीस ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
हे ही वाचा : धडकी भरवणारा 'एनर्जी लॉकडाउन' भारतात होणार लागू? काय खरं काय खोटं.. नेमकं घ्या समजून!
फरार आरोपीला पकडण्यासाठी 10 पथके
मुख्य आरोपी सुनील कुमार अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी दहा पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिसांनी आतापर्यंत चार संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. "आम्ही या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहोत आणि दोषीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा दिली जाईल," असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे. आपल्या पोटच्या गोळ्याला अशा प्रकारे गमावल्यामुळे प्रज्ञाच्या पालकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.
ADVERTISEMENT











