शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “मध्ये अमित शाह बोलले की असं काही ठरलंच नव्हतं. शिवरायांच्या साक्षीने आणि माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो. मी जे बोलतोय, ते जसंच्या तसं ठरलं होतं. भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदाचा अडीच-अडीच वर्षाचा काळ वाटून घ्यायचा, हे ठरलं होतं. हे मी माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगतोय”, असं सांगत भाजपनं शब्द न पाळल्याचा दावा ठाकरेंनी पुन्हा एकदा केलाय.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदेंची काढली लायकी; शिवसेनाप्रमुखांचं नाव घेत ठाकरे काय म्हणाले?
“आज जे तुम्ही केलंत, हेच तर मी तुम्हाला सांगत होतो. अडीच वर्ष तुमची अडीच वर्ष शिवसेनेची. तेव्हा तुम्ही म्हणालात शक्य नाही. आता जे केलं तेव्हा का नाही केलं. पण शिवसेना संपवायचीये. इतक्यावरच नाहीये. हाव किती. इतरांना बाजूला सारून तुला आमदार केलं. मंत्री केलं. आता मुख्यमंत्री झालात. शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेनाप्रमुख व्हायचं. शिवसेनाप्रमुख म्हणून तुम्ही त्यांना स्वीकारणार का? आहे लायकी?”, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी थेट एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं.
बाप चोरणारी औलाद, असा एकनाथ शिंदेचा उल्लेख
“स्वतःच्या वडिलांच्या नावानं मतं मागायची हिंमत नाही. बाप चोरणारी औलाद. स्वतःच्या वडिलांचा तरी विचार करायचा होता. त्यांना काय वाटेल, काय दिवटं कारटं जन्माला आलं. ना स्वतःचे विचार. शिवसेनाप्रमुखांचे फोटो लावून मतं मागायची. आनंद दिघे आपल्यातून जाऊन २० वर्ष झालीत. आजपर्यंत कधी आनंद दिघे आठवले नव्हते, आज आठवताहेत कारण आज आनंद दिघे काही बोलू शकत नाहीत. आनंद दिघे एकनिष्ठ होते. जाता सुद्धा ते भगव्यातून गेले”, असं म्हणत ठाकरेंनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर शाब्दिक वार केलाय.
शिवसेना दसरा मेळावा २०२२ : उद्धव ठाकरे शिंदे गटाबद्दल काय म्हणालेत?
“त्यावेळी अनेकांना असा प्रश्न पडला होता की, आता शिवसेनेचं काय होणार? माझ्या मनात चिंता नव्हती. कारण ज्याने हे कार्य सोपवलंय, तो बघून घेईन. आज शिवतीर्थ बघितल्यानंतर पुन्हा त्यांच्या मनात प्रश्न पडला अरे बापरे गद्दारांचं कसं होणार? इकडे एक सुद्धा माणूस भाड्याने आणलेला नाही. तासाची बोली लावून आणलेला नाही. यापैकी कुणीही… माझ्या माता भगिनींना विचारा… लोक चालत आलेत. त्यांना विचारलं तर ते सांगतील की, तितके ‘एक’टा आहे, इकडे एकनिष्ठ आहे. एकनिष्ठ सगळे माझ्यासमोर बसले आहेत. जे मला शिवसेनाप्रमुखांनी जोडून दिलंय”, असं उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात बोलताना म्हणाले.
“ही ठाकरे कुटुंबियांची कमाई आहे. दरवर्षी परंप्रमाणे दसरा मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे. पण यंदाचा रावण वेगळा आहे. जसा काळ बदलतो, तसा रावणही बदलतो. आतापर्यंत दहा तोंडांचा होता. आता डोक्यांचा नाही, खोक्यांचा खोकासूर आहे. धोकासूर आहे”, असं म्हणत ठाकरेंनी थेट एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर निशाणा साधला.
ADVERTISEMENT