स्याही से नहीं... कभी-कभी सड़कों पर निकले कदमों से भी इतिहास लिखा जाता है,
ADVERTISEMENT
और जब नौजवान जागते हैं... तो सत्ता नहीं, पूरा दौर बदल जाता है...
देशात आज पुन्हा एकदा विद्यार्थी आणि तरुण रस्त्यावर उतरलेयत. दिल्लीच्या रस्त्यांवर घोषणाबाजी सुरूय. सरकारविरोधात संताप व्यक्त केला जातोय. पण हा भारतासाठी पहिलाच प्रसंग नाही. कारण स्वातंत्र्यानंतर तीन विद्यार्थी आंदोलनं झाली की ज्यानं राजकारणच नाही तर अवघ्या देशालाच ढवळून काढलं... एका आंदोलनामुळे देशात आणीबाणी लागू झाली. दुसऱ्या आंदोलनामुळे संपूर्ण जातीचं राजकारण बदललं. आणि तिसऱ्या आंदोलनाने भ्रष्टाचाराविरोधात देशव्यापी लाट निर्माण केली. या तीनही आंदोलनांमधील एक बाब अशी की ही तीनही आंदोलनं Gen Z नसताना झालेली. ज्यांचा परिणाम आजही भारतीय राजकारणावर दिसतोय.
आंदोलन क्रमांक 1 - नवनिर्माण आंदोलन
1973 च्या अखेरीस गुजरातमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात जेवणाचे दर वाढले. सुरुवातीला हा प्रश्न फक्त मेस फीचा होता. पण काही दिवसांतच विद्यार्थ्यांचा संताप संपूर्ण गुजरातभर पसरला.
हे ही वाचा>> पोटची दोन्ही पोरं पोलिसांच्या ताब्यात, आई सोनिया गांधींची पोलीस ठाण्यात धाव अन्...
महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी या घटकांमुळे काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्या सरकारविरोधात मोठं आंदोलन उभं राहिलं. आंदोलनाला हिंसक वळण लागलं. दुसरीकडे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही जणांचा जीवही गेला. त्यामुळे हे आंदोलन अधिक चिघळलं. अखेर हिंसक आंदोलकांना रोखण्यासाठी सरकारला लष्कराला पाचारण करावे लागलं होतं. शेवटी परिस्थिती इतकी गंभीर झाली की तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना गुजरात विधानसभा बरखास्त करावी लागली आणि मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांची पक्षातून हकालपट्टीही करावी लागली.
ही घटना देशभर चर्चेचा विषय ठरली आणि इथूनच देशात सरकारविरोधी विद्यार्थी आंदोलनांना मोठी ताकद मिळाली.
आंदोलन क्रमांक 2 - बिहार विद्यार्थी आंदोलन आणि जेपी आंदोलन
जर भारताच्या राजकारणाला सर्वाधिक धक्का देणाऱ्या आंदोलनाचं नाव घ्यायचं असेल. तर अनेक इतिहासकार सर्वप्रथम जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाचा उल्लेख करतात.
हे ही वाचा>> उद्धव ठाकरे अचानक रात्रीच पोहचले जंतर-मंतरवर, दिपकेच्या पाठीवर थाप अन् घणाघाती भाषण! जसंच्या तसं..
सुरुवात झाली ती बिहारमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी.. याच मुद्द्यांविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं.
यानंतर स्वातंत्र्यसैनिक जयप्रकाश नारायण यांनी या आंदोलनाचं नेतृत्व स्वीकारलं. त्यांनी दिला एक नारा "संपूर्ण क्रांती."
देशभर लाखो तरुण पुन्हा रस्त्यावर उतरले. केंद्र सरकारवर दबाव वाढू लागला. 1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली.
हजारो विरोधी नेत्यांना अटक झाली. प्रेसवर निर्बंध आले. पण, 1977 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा प्रथमच काँग्रेसला केंद्रात सत्ता गमवावी लागली. जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं.
अनेक विश्लेषकांच्या मते हे आंदोलन भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या टर्निंग पॉइंटपैकी एक ठरलं.
आंदोलन क्रमांक 3 – मंडल आयोग आंदोलन
साल 1990... पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा केली. ओबीसी समाजासाठी 27 टक्के आरक्षण लागू करण्यात आलं. देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी याला विरोध केला. विशेषतः उत्तर भारतात.
रस्त्यावर मोठी आंदोलनं झाली. काही विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचे प्रयत्नही केले. या आंदोलनाने देश हादरला. पण याच निर्णयामुळे भारतीय राजकारणात एक मोठा बदल झाला. जातीय समीकरणं बदलली. ओबीसी नेतृत्व राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं.
लालू प्रसाद यादव, मुलायम सिंह यादव, नितीश कुमार अशा अनेक नेत्यांचा केंद्रीय राजकारणात प्रभाव वाढला.
अनेक राजकीय अभ्यासकांच्या मते, 1990 नंतर भारतातील निवडणुकांचं गणित कायमच बदललं.
तीन आंदोलनांमध्ये समान धागा कोणता?
पहिलं आंदोलन महागाई आणि भ्रष्टाचारावर, दुसरं आंदोलन संपूर्ण व्यवस्थेविरोधात आणि तिसरं आंदोलन आरक्षणाच्या प्रश्नावर.
मुद्दे वेगळे होते पण एक गोष्ट समान होती. प्रत्येक आंदोलनाची सुरुवात विद्यार्थ्यांनी केली होती आणि त्यानंतर संपूर्ण देशातील राजकारण बदलत गेलं.
इतिहासातील 3 आंदोलन आणि आजच्या दिल्ली आंदोलनात काय साम्य?
आज राजधानी दिल्लीत पुन्हा तरुण रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या मागण्या वेगळ्या असू शकतात, परिस्थिती वेगळी असू शकते.. पण इतिहास एक गोष्ट शिकवतो की, भारतात जेव्हा मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी संघटित होतात तेव्हा त्या आंदोलनाकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहिलं जात नाही. त्याचे सामाजिक, राजकीय आणि लोकशाहीवरील परिणामही दीर्घकाळ जाणवू शकतात.
इतिहास सांगतो, विद्यार्थ्यांची आंदोलनं केवळ विद्यापीठांच्या गेटपर्यंत मर्यादित राहत नाहीत. काही आंदोलनं सरकार बदलतात, काही राजकीय विचारधारा बदलतात. तर काही संपूर्ण देशाचं राजकीय समीकरण बदलून टाकतात.
आता प्रश्न असा आहे की, दिल्लीत सुरू असलेलं सध्याचं आंदोलनही भविष्यात भारतीय राजकारणातील आणखी एक मोठं वळण ठरेल का? पण याचं उत्तर येणारा काळच देईल. कारण...
"वक्त की आदत है...
वो हर सवाल का जवाब देता है।
लेकिन इतिहास की आदत है...
वो जवाब देने वालों का भी हिसाब रखता है."
ADVERTISEMENT












