Aaditya Thackeray on Eknath Shinde ministers boycott cabinet meeting : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड ढवळून निघालंय. जिल्हा ते तालुका पातळीवर राजकारण तापले असून, तिकीट निश्चिती आणि भविष्यातील राजकीय गणित लक्षात घेऊन अनेक स्थानिक नेते पक्षांतर करत आहेत. भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या हालचाली दिसत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर बरेच नेते शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जात आहेत. या सततच्या पक्षबदलांमुळे महायुतीत नाराजीचा सुर वाढलाय. याच पार्श्वभूमीवर आज (18 नोव्हेंबर) मंत्रालयात शिंदेंच्या मंत्र्यांनी नाराजी दर्शवली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकींना बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय. भाजपने आमच्या पक्षातील नेते फोडू नये, असा इशारा शिंदेंच्या शिवसेनेला या बहिष्काराच्या माध्यमातून द्यायचा असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, शिंदेंच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी x या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शिंदेसेनेवर निशाणा साधलाय.
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे म्हणाले, असं कळलंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. गेलेच नाहीत! का? तर म्हणे राग आलाय! भयंकर राग! मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपावर! निवडणुकीतलं जागावाटप आणि म्हणे ह्यांचा पक्ष फोडताएत म्हणून! ह्याला म्हणतात चोर मचाये शोर! पण ह्यांच्या स्वार्थापोटी राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे! मंत्रीमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत! कसा चाललाय हा कारभार?! महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे. चला, आज परत कोणीतरी गावी जाणार…
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











