अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत भाजपने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिल्यानंतर या मतदारसंघातील राजकीय समीकरणांची मोठी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तनपुरे यांना पक्षाने तातडीने उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या विरोधात खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत राणी लंके यांनी अर्ज भरला नाही. याची नेमकी कारणे कोणती आहेत? समजून घेऊयात...
ADVERTISEMENT
कोणाकडे किती मतं आहेत?
अहिल्यानगर मतदारसंघातील एकूण 452 मतांपैकी भाजपकडे 207, शिवसेनेकडे 44, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 64, तर इतर आणि महाविकास आघाडी मिळून 137 मते असल्याचे चित्र आहे. या आकडेवारीमुळे भाजप आणि महायुतीचे संख्याबळ अधिक असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, काँग्रेस नेते करण ससाणे यांनी काँग्रेसच्या तिकिटाऐवजी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा : पत्नी आणि पोलीस उपनिरीक्षकाच्या कथित अनैतिक संबंधामुळे पोलीस कर्मचाऱ्याने केले नको ते?
राणी लंके यांनी अर्ज का भरला नाही?
राणी लंके यांनी उमेदवारी अर्ज का भरला नाही, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वरपे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, महाविकास आघाडीतील जागावाटपात अहिल्यानगरची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली होती. काँग्रेसशी संबंधित उमेदवारांनी आधीच अर्ज दाखल केल्याने आणि आघाडीत मतभेद असल्याचा संदेश जाऊ नये म्हणून वरिष्ठ पातळीवरून थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय, या जागेवर भाजप आणि महायुतीकडे मोठं संख्याबळ आहे.
राजेंद्र वरपे यांनी असेही सांगितले की, महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस समर्थित उमेदवाराच्या पाठीशी उभा राहणार आहे. काँग्रेसकडे तुलनेने अधिक मते असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे राणी लंके यांची संभाव्य उमेदवारी मागे राहिली असून आता करण ससाणे यांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, करण ससाणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या घडामोडींमुळे प्राजक्त तनपुरे यांच्या निवडणुकीतील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT











