Exclusive: अजित पवारांसह 9 जणांची आमदारकी जाणार?, राहुल नार्वेकरांचं मोठं विधान…

साहिल जोशी

04 Jul 2023 (अपडेटेड: 04 Jul 2023, 01:53 PM)

अजित पवारांच्या बंडानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय पक्ष कोण, आमदार अपात्रतेचं काय होणार.. यासारखे प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सगळ्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई Tak सोबत एक्स्क्लुझिव्ह बातचीत करताना मोठं विधान केलं आहे.

Vidhan Sabha Speaker Rahul Narwekar has made a big statement on MLA disqualification in an exclusive interview with Mumbai Tak.

Vidhan Sabha Speaker Rahul Narwekar has made a big statement on MLA disqualification in an exclusive interview with Mumbai Tak.

follow google news

मुंबई: एकीकडे शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रश्न प्रलंबित असतानाच आता राष्ट्रवादीच्या 9 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर (Rahul Narvekar) आलं आहे. त्यामुळे अजित पवारांसह (Ajit Pawar) 9 जणांची आमदारकी देखील धोक्यात आली आहे. असं असताना नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. याचविषयी मुंबई Tak चे (Mumbai Tak) मुख्य संपादक साहिल जोशी यांनी राहुल नार्वेकरांशी एक्सक्लुझिव्ह चर्चा केली. (ajit pawar revolt political party mla disqualification vidhan sabha speaker rahul narwekar big statement exclusive interview mumbai tak)

हे वाचलं का?

‘आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याबाबत मला फार घाई करायची नाहीए. पण मला निर्णय देताना कोणताही उशीर करायचा नाही.. पण घिसाडघाई करून अन्याय होईल असा निर्णय देखील द्यायचा नाही.’ असं विधान राहुल नार्वेकरांनी केलं आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत:

प्रश्न: शुक्रवारी अजित पवारांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर विधीमंडळ नेतेपदावरुन जयंत पाटलांना हटवून अजित पवारांची निवड करण्यात आल्याचं पत्र आपल्याकडे देण्यात आलं. या सगळ्या प्रकरणाबाबत आपल्याला काय वाटतं?

राहुल नार्वेकर: आजची जी राजकीय परिस्थिती आहे त्या विधीमंडळात जो गट आहे त्यापैकी कोणत्याही गटाने माझ्याकडे असं कोणतंही निवेदन दिलेलं नाही की, पक्षात कोणत्याही प्रकारची फूट पडलेली आहे. त्यामुळे आज माझ्यासमोर राष्ट्रवादी विधीमंडळ पक्ष आहे तो आतापर्यंत एकच गट असल्याचं दिसतं आहे. केवळ नेतृत्वाबद्दल वाद आहे. असं चित्र माझ्यासमोर ठेवण्यात आलं आहे. जर नेतृत्वाबाबत वाद असताना आम्ही निर्णय घेताना कोणाला अधिकृत पक्षाचा नेता मानतो ते आम्हाला ठरवावं लागेल. ते ठरवल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत येऊ शकू की त्या राजकीय पक्षाच्या नेमक्या मागण्या काय आहेत, कोण प्रतोद बनलं पाहिजे, कोण गटनेतं बनलं पाहिजे.. ते ठरवलं जाईल.

माझ्याकडे यासंबंधी अनेक पत्रं समोर आली आहेत. त्यामुळे याबाबत सचिवालयात आकलन केलं जात आहे.
आमच्याकडे 1-2 अपात्रतेची प्रकरणं समोर आली आहे.

महत्त्वाचं म्हणजे जितेंद्र आव्हाड यांना पक्षाच्या वतीने विरोधी पक्ष नेता नियुक्त करण्याची मागणी आहे. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, विरोधी पक्ष नेत्याला नियुक्त करण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो. विधानसभेचे नियम आहेत जसं की, विरोधी पक्षाचे नेमके किती आमदार आहेत हे पाहणं, वैगरे..

सर्वप्रथम आपल्याला हे पाहावं लागेल की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माझ्यासमोर आहे. एकतर मला तो पक्ष विरोधी पक्ष आहे असं ठरवावं लागेल किंवा ते सत्ताधारी पक्षात आहेत हे ठरवावं लागेल. एकाच पक्षाला मी विभागू शकत नाही. त्यानंतर आम्ही हे देखील पाहू की, राजकीय पक्ष आहे त्या राजकीय पक्षाचं नेतृत्व कोण करतंय. त्या पक्षाच्या नेत्याने पक्ष घटनेनुसार आमच्याकडे जे निवेदन दिलं असेल.. त्यानुसार आम्ही पुढचे निर्णय घेऊ.

प्रश्न: विरोधी पक्ष नेता आणि व्हीप बदल्याण्याबाबत जयंत पाटलांकडून आपल्याकडे जे पत्र पाठविण्यात आलं ते पुरेसं नाही का?

राहुल नार्वेकर: मेरीटवर निर्णय घेतल्यानंतर आम्ही आपल्याला याबाबत नेमकं काय ते सांगू शकतो.

प्रश्न: पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी आपल्याला पत्र लिहून कळवलंय हे आपल्यासाठी पुरेसं नाही?

राहुल नार्वेकर: सर्वात आधी हे ठरवावं लागेल की, पक्षाचं नेतृत्व करतंय कोण. त्या पक्षाचा नेता कोण आहे हे देखील ठरवावं लागेल. केवळ अपात्रतेच्या वेळेस नाही.. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात म्हटलं आहे की, प्रतोदची नेमणूक ही राजकीय पक्षाने अधिकृतपणे केली पाहिजे. त्यामुळेच तो राजकीय पक्ष कोण आहे हा जेव्हा माझ्यासमोर वाद आहे.. जेव्हा दोन व्यक्ती त्या पक्षाच्या नेतृत्वाबद्दल दावा करत आहेत तेव्हा सर्वात आधी मला हे ठरवावं लागेल की, त्या पक्षाचं नेतृत्व कोण आहे. त्यानुसार मला प्रतोद ठरवावं लागेल.

प्रश्न: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आहे की विरोधात हे आपल्याला लवकरात लवकर ठरवावं लागणार आहे. ते कसं ठरवणार तुम्ही?

राहुल नार्वेकर: आम्हाला सगळ्यात आधी राजकीय पक्ष म्हणून नेतृत्व कोणाचं आहे हे ठरवावं लागेल. ते ठरवल्यानंतर ते नेतृत्व जो निर्णय घेईल जे त्या पक्षाच्या घटनेनुसारच अपेक्षित आहे. त्यानुसार आम्ही योग्य निर्णय घेऊ

प्रश्न: एक गट सत्तेत बसणार आहे दुसरा गट विरोधी पक्षात.. तुमच्यासमोर अनेक पेच आहेत ते तुम्ही कसे सोडवणार?

राहुल नार्वेकर: हा काही अडचणीचा मुद्दा नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आमच्याकडे नियम आणि प्रक्रिया आहे. आम्ही नियमानुसारच काम करू. त्यामध्ये काही अडचणी येणार नाहीत. हे सगळे निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ.

प्रश्न: खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष कोण असणार मग?

राहुल नार्वेकर: विरोधात एकच पक्ष नाहीए.. तर तीन पक्ष आहेत. तीनपेक्षा अधिक पक्ष आहेत. त्या सर्व पक्षांच्या आमदारांच्या संख्येचा विचार करावा लागणार आहे. तसेच नियम तपासावे लागणार आहेत. त्यानंतर ज्याला विरोधी पक्ष नेता म्हणून मान्यता द्यायची आहे त्याला आम्ही मान्यता देऊ. जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय सर्व नियमांचे पालन करून घेतला जाईल.

प्रश्न: तुम्ही दोन्ही गटांना काही नोटीस बजावली आहे का?, काही कार्यवाही सुरू केली आहे का?

राहुल नार्वेकर: प्रक्रिया सुरू झाली आहे. माझ्याकडे काही गोष्टीच कालच आल्या आहेत. त्या गोष्टी सचिवालयात जातील त्यावर काही बाबी तपासल्या जातील. नंतर निर्णय घेतला जाईल.

प्रश्न: असं वाटतंय की तुम्हाला फार घाई नाही?

राहुल नार्वेकर: मला फार घाई करायची नाहीए. मला निर्णय देताना कोणताही उशीर करायचा नाही.. पण घिसाडघाई करून अन्याय होईल असा निर्णय देखील द्यायचा नाही.

प्रश्न: शिवसेनेबाबतच्या व्हीपविषयी देखील आपल्याकडे प्रकरण प्रलंबित आहे. त्याबाबत आपण ऑगस्ट महिन्यात निर्णय देणार आहात का?

राहुल नार्वेकर: कोर्टाने आदेशात म्हटलं आहे की, लवकरात लवकर वाजवी वेळेत निर्णय घ्यायचा आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो की, कोणत्याही प्रकारचा वेळ आम्ही वाया घालवत नाहीएत. आमचा प्रयत्न आहे की, लवकरात लवकर या विषयी निर्णय द्यावा. आमच्याकडून विलंब होणार नाही. सर्व नियमांचे पालन करून निर्णय देऊ.

प्रश्न: जेव्हा शिंदे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा कोणाचा व्हीप लागू होता हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे.

राहुल नार्वेकर: शिवसेनेच्या बाबतीत राजकीय पक्ष कोण आहे याबाबत सुरुवात करायची आहे. या सगळ्या गोष्टी पाहूनच निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे आम्ही याबाबत कोणताही उशीर करणार नाही किंवा घाई देखील करणार नाही.

सुप्रीम कोर्टाने जो वाजवी वेळ म्हटला आहे. त्यानुसार जो गरजेचा वेळ आहे त्यानुसार आपल्याला निर्णय द्यायचा आहे. आता प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ लागतो तोच वाजवी वेळ असतो. आता प्रक्रिया सुरू आहे. प्रक्रिया पूर्ण झाली की आम्ही निर्णय देऊ.

प्रश्न: एका प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला नव्हता तेव्हा कोर्टाने आदेश दिले होते की, त्यांनी तीन महिन्यात निर्णय घ्यावा. आता शिवसेनेच्या प्रकरणात देखील तुम्हाला असंच काही दिसतंय का?

राहुल नार्वेकर: हे अपेक्षित आहे की, कमीत कमी वेळत आणि नियमांचे उल्लंघन न करता निर्णय घेणं अपेक्षित आहे. त्यालाचा वाजवी वेळ म्हणतात. जो निर्णय आम्ही घेतो तो न्यायाला धरून असला पाहिजे. हे सगळं करण्यासाठी जो वेळ लागतो तोच वेळ असेल.

प्रश्न: शिवसेनेने म्हटलं आहे की, आपण लवकर निर्णय नाही घेतला तर ते पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार आहेत.

राहुल नार्वेकर: मी हा निर्णय सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानुसार वाजवी वेळेतच घेईल.

प्रश्न: खरी शिवसेना, खरी राष्ट्रवादी कोण हे आपण कसं ठरवणार? त्याची प्रक्रिया काय असेल

राहुल नार्वेकर: सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आला आहे त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, अध्यक्ष जेव्हा व्हीपला मान्यता देतात तेव्हा ते पक्ष नेतृत्व कोण आहे त ठरवतात. विधीमंडळातील राजकीय पक्ष कोण हे ठरविण्यासाठी कोर्टाने निर्णयात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्या सगळ्या नियमांचे आपण पालन करू.

 

    follow whatsapp