'तो' प्रश्न विचारताच आण्णा हजारे मुंबई Tak च्या मुलाखतीतून उठून गेले...

मुंबई तक

23 Jul 2026 (अपडेटेड: 23 Jul 2026, 01:41 PM)

anna hazare walks out of mumbai tak interview : मुंबई Tak च्या मुलाखतीत आण्णा हजारे यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि सरकारच्या भूमिकेवर भाष्य केले. मात्र, एका राजकीय प्रश्नानंतर त्यांनी मुलाखत पुढे न चालवता उठून जाणे पसंत केले.

Anna Hazare

Anna Hazare

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'तो' प्रश्न विचारताच आण्णा हजारे मुंबई Tak च्या मुलाखतीतून उठून गेले...

point

मुंबई Tak च्या मुलाखती नेमकं काय घडलं?

Anna Hazare walks out of mumbai tak interview : दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांनी मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापराबाबत सविस्तर भाष्य केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्याची माहिती दिली. सर्वोच्च नेतृत्व म्हणून त्यांना पत्र लिहिल्याचे सांगत, देशाने अहिंसेच्या मार्गानेच पुढे जावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. आंदोलनादरम्यान झालेला कथित लाठीचार्ज आणि हिंसाचार चुकीचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारने पुढे काय करावे, यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, "जे घडले ते चुकीचे झाले," असे ते म्हणाले.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'काँग्रेसविरुध्द लढले ही चूक वाटते... काँग्रेस खरंच चांगली!' अंजली दमानियांची स्फोटक चावडी

जनता जे म्हणते ते ऐकण्यात दोष नाही - आण्णा हजारे 

मुलाखतीदरम्यान आण्णा हजारे यांनी चुकीच्या व्यक्तींवर जबाबदारी टाकणे योग्य नसल्याचेही सांगितले. "खरे दोषी असतील त्यांनाच दोषी ठरवले पाहिजे. निरपराध व्यक्तींना दोष देणे योग्य नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याबाबत विचारण्यात आले असता, "जनता ही मालक आहे आणि आम्ही सर्व तिचे सेवक आहोत. जनता जे म्हणते ते ऐकण्यात दोष नाही. जे चुकीचे आहे ते चुकीचे आणि जे योग्य आहे ते योग्य," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा : विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून ठाकरे बंधू आक्रमक; 26 जुलैला मुंबईत भव्य मोर्चाची घोषणा!

आमच्या कोणत्याही आंदोलनात हिंसा झाली नव्हती - हजारे 

आपल्या 22 उपोषणांचा उल्लेख करताना आण्णा हजारे म्हणाले की, त्यांच्या कोणत्याही आंदोलनात हिंसा झाली नव्हती. त्या आंदोलनांमुळे देशात दहा कायदे अस्तित्वात आले आणि त्याचा फायदा जनतेला झाला, असे त्यांनी सांगितले. पूर्वीच्या आंदोलनावेळी सरकार 13 दिवसांत चर्चेसाठी पुढे आले होते, मात्र आता विद्यार्थ्यांशी संवाद होत नसल्याचे समोर येत असल्याचे सांगत त्यांनी सरकारने जनतेचे म्हणणे ऐकण्यासाठी स्वतः पुढे जावे, असे मत व्यक्त केले. "सरकार हे जनतेचे सेवक आहे. जनतेकडे जाऊन त्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे. त्यांना तुरुंगात ठेवणे योग्य नाही," असेही त्यांनी म्हटले.

मुलाखतीच्या शेवटी आण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा जन्म झाला होता. सध्याच्या आंदोलनानंतरही तशाच प्रकारची राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. मात्र, "मला माहिती नाही," एवढेच उत्तर त्यांनी दिले. त्यानंतर आणखी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न होत असताना त्यांनी संवाद पुढे न वाढवता मुलाखतीतून उठून जाणे पसंत केले.