कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आज (4 मे) मतमोजणीच्या दिवशी ममता बॅनर्जी यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यांचा पारंपरिक गड समजल्या जाणाऱ्या भबानीपूर (भवानीपूर) मतदारसंघातून भाजपचे शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे. सुमारे 15 हजाराहून अधिक मतांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. जो ममता बॅनर्जी यांच्यासाठी वैयक्तिकरित्या मोठा झटका आहे. एकीकडे राज्याची सत्ता गमावणं आणि दुसरीकडे स्वत:च्या आमदारकी गमावणं असा डबल धक्का ममता दीदींना बसला आहे.
ADVERTISEMENT
ममता दीदींसाठी आजच्या दिवशी दोन मोठे आघात सहन करावे लागले. राज्यभरात तृणमूल काँग्रेस (TMC) चा व्यापक पराभव होत असताना, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत: आपल्या मतदारसंघात हरल्या आहेत. भाजपने राज्यात बहुमताकडे झेप घेतली असून, अनेक प्रदेशांत टीएमसीला मोठा फटका बसला आहे.
भबानीपूर लढत: ऐतिहासिक उलथापालथ
भबानीपूर ही ममता बॅनर्जी यांची पारंपरिक जागा मानली जाते. 2021 च्या निवडणुकीत नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर ममता यांनी भबानीपूरमधून पोटनिवडणूक लढवून विजय मिळवला होता. यंदा मात्र शुभेंदू अधिकारी यांनी पुन्हा एकदा ममता यांना थेट आव्हान दिले होते. जे आव्हान त्यांनी यशस्वीरित्या पेलली देखील.
हे ही वाचा>> बंगालमध्ये मोदी-शाहांनी शेवटच्या 7 दिवसांत 'अशी' पलटली बाजी... ही आहे भन्नाट Inside Story
मतमोजणीच्या विविध फेऱ्यांमध्ये आघाडी मागे-पुढे होत राहिली, मात्र शेवटच्या फेऱ्यांत शुभेंदू अधिकारी यांनी 15 हजारांहून अधिक मतांनी निर्णायक आघाडी घेतली. या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते, कारण ही केवळ एका जागेची लढाई नव्हती तर बंगालच्या राजकारणातील 'ममता विरुद्ध शुभेंदू' या वैयक्तिक आणि राजकीय द्वंद्वाचा प्रतीकात्मक मुकाबला होता.
शुभेंदू अधिकारी, जे पूर्वी टीएमसीमध्ये ममता यांचे विश्वासू सहकारी होते, त्यांनी पक्ष सोडल्यानंतर भाजपमध्ये सामील होऊन ममता यांच्या विरोधात आघाडी उघडली होती. 2021 च्या नंदीग्राम विजयानंतर त्यांनी भबानीपूरमध्येही ममता यांना आव्हान देण्याची तयारी दर्शविली होती. तब्बल 15 वर्ष भबानीपूरमध्ये टीएमसीचा गड होता. जो शुभेंदू अधिकारी यांनी उद्ध्वस्त केला आहे.
राज्यभर टीएमसीचा धुव्वा
भबानीपूरमधील या पराभवाबरोबरच राज्यातील एकूण चित्र टीएमसीसाठी निराशाजनक आहे. भाजपने जलपाईगुडी, बर्धमान, जंगलमहल आणि प्रेसिडेंसी विभागात भक्कम मुसंडी मारली आहे. टीएमसीचा पारंपरिक प्रभाव असलेल्या भागांतही भाजपने मोठी घुसखोरी केल्याचे दिसते.
हे ही वाचा>> PM Modi: 'जिथे भाजप तिथे...', बंगालमध्ये 'कमळ' फुलताच PM मोदींनी दिली 'ती' गॅरंटी!
दरम्यान, भबानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी यांनी मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता, काही फेऱ्यांमध्ये गैरप्रकार झाल्याचे आरोप त्यांनी केले होते. मात्र, आता शेवटच्या फेरीनंतर ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
राजकीय परिणाम आणि प्रतिक्रिया
या पराभवामुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. टीएमसीमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भाजपसाठी हा मोठा नैतिक विजय मानला जात आहे. शुभेंदू अधिकारी यांनी 'बंगाल परिवर्तन'च्या अभियानाला बळकटी दिली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, भबानीपूरमधील पराभव ममता यांच्या 'अजेय' प्रतिमेला तडा देतो. 2021 च्या नंदीग्राम पराभवानंतर भबानीपूर ही त्यांची 'सुरक्षित जागा' होती, तीही गमावल्याने टीएमसी पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.
ही निवडणूक बंगालच्या राजकारणात एक टर्निंग पॉइंट ठरू शकते. 'ममता दीदीं'ना एकाच दिवशी पक्षीय पराभव आणि वैयक्तिक पराभव स्वीकारावा लागला आहे.
ADVERTISEMENT











