‘भाजप सापत्न वागणूक देतंय’, अगदी वर्षभरातच शिंदेंच्या शिवसेना नेत्याला असं का म्हणावं लागलं?

मुंबई तक

26 May 2023 (अपडेटेड: 26 May 2023, 02:48 PM)

भाजप आम्हाला सापत्न वागणूक देत आहे. असं वक्तव्य शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी केलं आहे. यामुळे शिवसेना आणि भाजपमधील धुसफूस आता समोर आली आहे.

bjp is giving us secondary treatment why did shiv sena leader gajanan kirtikar have to say this within a year

bjp is giving us secondary treatment why did shiv sena leader gajanan kirtikar have to say this within a year

follow google news

Maharashtra political news: मुंबई: भाजप (BJP) आणि शिवसेना (शिंदे गट) (Shiv Sena) यांच्यात सारं काही आलबेल नसल्याचं आता समोर आलं आहे. अवघ्या नव्या युतीतून तयार झालेल्या या सरकारमध्ये आता धुसफूस सुरू झाली आहे. कारण शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. शिंदे गटातील लोकांना भाजप सापत्न वागणूक देत असल्याचं खासदार गजानन कीर्तिकर म्हटलं आहे. यावेळी त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबतही वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी शिंदे गट केवळ 22 जागांवर निवडणूक लढविण्याचा दावाच नाही करणार तर आम्ही त्यासाठी तयारी देखील केली आहे.

हे वाचलं का?

शिंदे गटाच्या खासदाराच्या या वक्तव्यामुळे भाजप-शिवसेना युतीमध्ये अंतर्गत संघर्ष असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे या प्रसंगाची निकड लक्षात घेऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगेच या मुद्द्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. विकासकामांच्या उद्घाटनासाठी फडणवीस शुक्रवारी अहमदनगरमध्ये आले होते. येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, कीर्तिकर असं बोललेच नाही!

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘गजानन कीर्तिकर यांनी असं त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही.. या कपोलकल्पित बातम्या आहेत. आमच्यात काहीही अडचण नाही. आम्ही समन्वयाने काम करत आहोत. शिवसेना-भाजप युतीत एकदम समन्वयाने काम होईल. सगळ्या गोष्टी ठरतील तेव्हा आम्ही आपल्याला सांगू,’

हे ही वाचा >> सरकारी अधिकाऱ्याचा प्रताप, सेल्फी घ्यायला गेला.. नंतर साहेबांनी अख्खा तलावच उपसला!

गजानन कीर्तिकर असं काय म्हणाले?

गजानन कीर्तिकर म्हणाले होते की, ‘एनडीएचे घटक आहोत आम्ही.. यापूर्वी आम्ही घटकपक्ष नव्हतो एनडीएचा. आता आमची त्या पद्धतीने कामं झाली पाहिजेत. घटक पक्षाला तेवढा दर्जा दिला पाहिजे. असा आमचा मुद्दा होता. असा दर्जा देत नाही असं आमचं म्हणणं आहे. भाजपकडून सापत्न वागणूक मिळते असं आमचं म्हणणं आहे.’ यावेळी कीर्तिकरांना विचारण्यात आलं की, ते लोकसभेला 22 जागांवर दावा करणार का? त्यावर कीर्तिकर म्हणाले, ‘दावा करण्याची गरज नाही. 22 जागा शिवसेनेच्या आहेतच.’ असं ते म्हणाले.

‘सीट शेअरिंग फॉर्म्युला 2019 मध्ये होता तसाच राहिला पाहिजे’

गजानन कीर्तिकर म्हणाले की, ‘जागावाटपाचा फॉर्म्युला 2019 मध्ये होता तसाच राहिला पाहिजे. त्यावेळी शिवसेनेने 23 तर भाजपने 26 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी भाजपने 22 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. येत्या लोकसभा निवडणुकीतही हेच सूत्र स्वीकारले पाहिजे. आम्ही इतक्या जागांवर फक्त दावाच सांगणार नाही तर तेवढ्या जागांवर लढण्याची तयारी आम्ही आधीच केली आहे.’ म्हणजेच आतापासूनच शिवसेनेने भाजपला एक प्रकारे इशाराच दिला आहे की भाजपने जागावाटपाचा कोणताही नवा फॉर्म्युला आणू नये.

हे ही वाचा >> शरद पवारांबद्दलच्या ‘त्या’ ट्विट्सनी अरविंद केजरीवालांचा ‘गेम’ केला!

एकनाथ शिंदेची सावध प्रतिक्रिया

दरम्यान, गजानन कीर्तिकरांच्या 22 जागा पाहिजे या मागणीवर तसेच भाजप सापत्न भावाची वागणूक देतंय या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजपसोबत बऱ्याच वर्षांपासून आम्ही आहोत, तसेच निवडणुकीला अजून वेळ आहे. सर्व गोष्टी व्यवस्थित होतील.’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

    follow whatsapp