'घृणास्पद विश्वासघात.. BJP ने आमचा केसाने गळा..', रामदास कदमांचा उघडउघड हल्ला

मुंबई तक

07 Mar 2024 (अपडेटेड: 07 Mar 2024, 12:37 PM)

Ramdas Kadam Criticized BJP: भाजपने आमचा विश्वासघात करू नये. असं विधान करत शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. जागा वाटपावरून सध्या महायुतीमध्ये बरीच धुसफूस सुरू आहे.

रामदास कदमांचा भाजपवर गंभीर आरोप

रामदास कदमांचा भाजपवर गंभीर आरोप

follow google news

Ramdas Kadam: मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जागा वाटपांबाबत सगळ्याच पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. त्यातही सत्तेत असणाऱ्या महायुतीमध्ये जागा वाटपावरून मोठी धुसफूस सुरू आहे. जी आता उघडपणे समोरही आली आहे. भाजप शिवसेनेला (शिंदे गट) 10 ते 12 पेक्षा अधिक जागा देण्यास तयार नसल्याचं समजतं आहे. त्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपने आमचा केसाने गळा कापू नये असं म्हणत.. थेट इशाराच दिला आहे. (bjp should not betray us ramdas kadam furious over seat allocation issue makes serious accusations and criticism against bjp)

हे वाचलं का?

एवढंच नव्हे तर रामदास असंही म्हणाले की, 'महाराष्ट्रातील भाजपचं राजकारण हे घृणास्पद सुरू आहे. पुन्हा-पुन्हा जर आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे...' असं म्हणत त्यांनी काही गंभीर आरोप देखील यावेळी केले. 

'भाजपचं राजकारण घृणास्पद, आमचा केसाने गळा कापू नका...'

'एक गोष्ट मी सांगेन की, उद्याच्या लोकसभेला मोठ्या फरकाने मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान होतील याबाबत सबंध देशात कोणाच्याही मनात कुठलीही शंका नाही. पण माझी एकच खंत आहे.. महाराष्ट्रात आम्ही शिवसेना असू दे, राष्ट्रवादी असू दे.. मोदीजी आणि शाहा यांच्या कामावर विश्वास ठेवून आलो आहोत.' 

'आमचा विश्वासघात होणार नाही.. याबाबत त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे. खरं पाहिलं तर ज्या सीटिंग जागा आहेत तिथे देखील भाजपची काही मंडळी प्रयत्न करत आहेत. आम्ही उमेदवार आहोत, तालुक्यांमध्ये जात आहेत. मतदारसंघांमध्ये जात आहेत.. जिथे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सीटिंग खासदार आहेत तिथेही हा जबरदस्तीचा प्रयत्न चालला आहे.' 

मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू दे, रायगड असू दे.. मावळ, संभाजीनगर मतदारसंघ असू दे.. इथे जे चाललंय ते अतिशय घृणास्पद चाललंय भाजपच्या माध्यमातून.. महाराष्ट्रातल्या.. माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की, मोदी आणि शाहा यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान उपटले पाहिजे, कान पकडले पाहिजे.. पक्ष प्रत्येकाला वाढवायचा आहेच. पण तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोकं आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका..

'भविष्यात वेगळा मेसेज आपण देत आहात. याचं भान भाजपच्या काही लोकांना असणं आवश्यक आहे.' 

'विधानसभा निवडणुकीत दापोली मतदारसंघात माझ्या मुलाच्या विरोधात भाजपने उघडपणे राष्ट्रवादीला मतदान केलं होतं, युती असताना.. 2009 मध्ये युती असताना मला भाजपनेच पाडलं. हे वास्तव आहे..' 

'आता देखील युती असताना... खरं तर आम्ही एवढा मोठा निर्णय घेतला विश्वासाने भाजपसोबत आलो आणि म्हणूनच मंत्रिमंडळ झालं. आता माझ्या मुलाच्या मतदारसंघात पुन्हा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते इथे बजेटची कामं आणून भूमिपूजनं आणि उद्घाटनाचे कार्यक्रम हे स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून करत आहेत. हेतूपूरस्पर त्रास देत आहेत.' 

हे असं असेल तर भविष्यात भाजपवर कोणी विश्वास ठेवणार नाही. याची दखल भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून घेतली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आम्ही मोदी आणि शाहा यांच्याकडे बघून आलोय. मागच्या निवडणुकीत काय झालं मला माहीत नाही.. पण पुन्हा-पुन्हा जर आमचा विश्वासघात जर झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे हे मी आज सांगतोय.

'मी देखील शिवसेनेचा नेता म्हणून गेली 25 वर्ष काम करतो आहे महाराष्ट्रात.. अधिक आज बोलणार नाही.. जेव्हा लोकसभेचं तिकीटं जाहीर होतील त्यावेळेस माझं वैयक्तिक मत काय आहे याबाबत मी पुन्हा बोलेन..' असं म्हणत रामदास कदम यांनी एक प्रकारे जागा वाटपासाठी भाजपवर दबावतंत्राचा वापर केला आहे. 

आता रामदास कदमांच्या या विधानानंतर किंवा आरोपांनंतर भाजप शिवसेनेला (शिंदे गट) किती लोकसभेच्या किती जागा देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 

    follow whatsapp