'रामाच्या नावावर सत्ता मिळवली, अन् आता…’, रामरक्षा आंदोलनात ठाकरे संतापले!

मुंबई तक

• 11:40 PM • 05 Jul 2026

ठाकरे गटाने अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी अपहारप्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी 'रामरक्षा आंदोलन' सुरू केले. या आंदोलनात रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसाचे पठण करून निषेध व्यक्त करण्यात आला.

power was gained in name of ram and now looting has begun uddhav thackeray lashes out at bjp during ramraksha agitation

उद्धव ठाकरे

Google CTA

मुंबईः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुंबईतील दादर येथील हनुमान मंदिर परिसरातून रविवारी 'रामरक्षा आंदोलन' करण्यात आले. अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या निषेधार्थ आयोजित या आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका करत हिंदुत्व, राम मंदिर आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. आंदोलनाची सुरुवात रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसाच्या पठणाने झाली. 

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

"सत्तेसाठी 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या, पण आज प्रभू रामांच्या नावाने आलेल्या देणगीवरच डल्ला मारला जात आहे." रामाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी श्रद्धेचाही विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. 

"राम मंदिर आंदोलनात शिवसैनिकांचं योगदान सर्वाधिक होतं." राम मंदिरासाठी शिवसैनिकांनी संघर्ष केला, त्यामुळे आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

"राम मंदिरातील कथित गैरव्यवहार हा केवळ आर्थिक घोटाळा नाही, तर कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेवर घाला आहे." दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. 

"हिंदू म्हणून हा अन्याय सहन करायचा नाही." पक्षभेद विसरून सर्व रामभक्तांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. 

"ही फक्त सुरुवात आहे." महाराष्ट्रातील प्रत्येक राम मंदिर आणि हनुमान मंदिरात 'रामरक्षा आंदोलन' राबवले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. 

"शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला आहे, पण शिवसेना संपणार नाही." विरोधकांवर टीका करत त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आवाहन केले. 

"आज दान कुठे गेलं, याचं उत्तर मिळालंच पाहिजे." रामभक्तांच्या देणगीचा हिशेब जनतेसमोर ठेवण्याची मागणी त्यांनी केली. 

"अन्यायाची लंका जाळून खाक करू आणि चोरांना तडीपार करू." भ्रष्टाचाराविरोधातील हा लढा असल्याचे सांगत त्यांनी जनतेला एकत्र येण्याचे आवाहन केले. 

आंदोलनाची पार्श्वभूमी 

अयोध्येतील राम मंदिराच्या देणगीशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर शिवसेना (यूबीटी)ने 'रामरक्षा आंदोलन' सुरू केले आहे. या आंदोलनातून रामभक्तांच्या श्रद्धेचे संरक्षण, कथित भ्रष्टाचाराविरोधात आवाज आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. ठाकरे यांनी लवकरच राज्यभर अशाच स्वरूपाची आंदोलने राबवण्याचाही निर्धार व्यक्त केला.