चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणूकीसंदर्भात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काँग्रेसच्या दोन गटांमधील वर्चस्वाची लढाई आता वेगळ्याच टप्प्यावर पोहोचली आहे. गुरुवारी (29 जानेवारी) नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या गटाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचं फिल्मी स्टाइलमध्ये अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय.
ADVERTISEMENT
बळजबरीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, वडेट्टीवार गटातील नगरसेवक पुण्याला गेले होते आणि गुरुवारी पहाटे 5.45 वाजताच्या सुमारास एका खाजगी बसने (एमएच 40 सीपी-9924) नागपूरला जात होते. यादरम्यान, वर्धा जिल्ह्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर येलकेली टोल प्लाझाजवळ, तिथून 4 ते 5 कारमधून येणाऱ्या 10 ते 15 तरुणांनी ती बस थांबवली. कारमधून खाली उतरलेल्या तरुणांनी नगरसेवकांवर धारदार शस्त्रे दाखवून दबाव आणला आणि जबरदस्तीने त्यांना गाडीत बसवण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर, विरोध केल्यानंतर आरोपींनी अश्लील भाषा वापरली आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. घटनेच्या वेळी नगरसेवक राजेश अडूर, त्यांची पत्नी अश्विनी अडूर, सचिन कट्याल, वसंत देशमुख, सोफिया खान, करिश्मा जंगल, अब्दुल करीम शेख आणि इतर नगरसेवक बसमध्ये उपस्थित होते.
हे ही वाचा: पुण्यातील मारणे टोळीचा 'शार्प शुटर' डॉन थेट धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत; शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
घटनेनंतर, नगरसेवक राजेश अडूर यांच्या तक्रारीच्या आधारे सावंगी पोलीस स्टेशनमध्ये 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटातील सौरभ ठोंबरे, कनैन शमीम सिद्दीकी, मुझम्मील खान, जसीम खान, आलोक रोहिदास, अदनान शेखसह इतर लोकांचा समावेश आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून कनैन शमीम सिद्दीकी नावाच्या एका आरोपीला पोलिसांनी पकडलं आणि त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने इतर आरोपींची नावे सांगितली.
हे ही वाचा: 'अजित दादांना कालच अग्नी दिलाय, त्यांच्या नावानं राजकारण करणं अमानुष..' संजय राऊतांनी व्यक्त केला संताप
सूत्रांच्या माहितीनुसार, चंद्रपूर महानगरपालिकेत खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटांत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. त्यामुळे या राजकीय रस्सीखेचातून ही घटना घडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT











