जंतर-मंतरवरील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात काय घडतंय? दीपके काय म्हणाले?

अभिजित दीपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधील कथित गैरव्यवहारांची जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात येत आहे.

Cockroach Janta Party

Cockroach Janta Party

मुंबई तक

• 01:29 PM • 06 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलक एकवटले

point

दीपके काय म्हणाले?

point

पुढं काय होणार?

Cockroach Janta Party : दिल्लीतील विमानतळावर आज (6 जून) सकाळी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांचे आगमन झाले. यानंतर पोलिसांनी त्यांना आंदोलनासाठी परवानगी दिली आणि ते दिल्लीतील जंतरमंतर याठिकाणी पोहोचले. येथे 'कॉकरोच जनता पार्टी'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात बोलताना दीपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधील कथित गैरव्यवहारांची जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात येत आहे. मात्र, केंद्र सरकार आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी दीपके यांनी केला.

हे वाचलं का?

'हा लढा दीर्घकालीन'

या आंदोलनादरम्यान आंदोलकांना संबोधित करताना अभिजित दिपके म्हणाले की, हा लढा दीर्घकालीन आहे. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही गेल्या एका महिन्यापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने करत आहोत. परंतु, केंद्र सरकारला या गंभीर विषयाचे काहीही सोयरसुतक नसून, ते केवळ आमच्या मागण्या दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे ही वाचा : जनगणनेसाठी गेलेल्या शिक्षिकेला मुख्याध्यापकानंच..., नेमकं काय घडलं?

'आम्हाला मैदानातून पुसता येणार नाही'

आपला संताप व्यक्त करताना दिपके पुढे म्हणाले की, हे लोक इतके निर्लज्ज आहेत की आमच्या मुख्य मागण्यांवर कोणतीही ठोस कारवाई करण्याऐवजी त्यांचे संपूर्ण लक्ष आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर आहे. आमचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक करणे आणि त्यावरील पोस्ट डिलीट करणे यांसारख्या फालतू गोष्टींमध्येच सरकार मग्न आहे. तुम्ही आमच्या पोस्ट नक्कीच डिलीट करू शकता, पण या मैदानातून आणि संघर्षातून आम्हाला कधीही पुसून टाकू शकत नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

हे ही वाचा : खून करुन जंगलात जाळली बॉडी, दहावीत शिकणाऱ्या राधिकाला का संपवलं?

आंदोलनाची पुढील दिशा काय?

शनिवारी (6 जून) पार पडलेल्या या पहिल्या टप्प्यातील आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीने आपल्या पुढील आंदोलनाची रणनीती देखील जाहीर केली आहे. आपल्या मागण्यांसाठी हा संघर्ष आणखी तीव्र करण्याचा निर्धार पक्षाने केला असून, आगामी 23 जून रोजी नवी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर भव्य जनसमुदाय एकत्र करून पुढील आंदोलन होणार असल्याची माहिती समोर येत आहे.