Inside स्टोरीः भाजपने नेते फोडले म्हणून शिंदेंचे मंत्री संतापले अन् CM कडे गेले.. फडणवीसांनी त्यांनाच झापलं! मंत्रालयात नेमकं...

ऋत्विक भालेकर

• 07:00 AM • 19 Nov 2025

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने शिवसेना शिंदे गटाचे नेते फोडल्याने शिवसेनेचे मंत्री हे नाराज होऊन CM फडणवीसांकडे गेले होते. जाणून घ्या त्यावेळी नेमकं काय घडलं.

Mumbai Tak
Google CTA

मुंबई: महाराष्ट्राच्या महायुती सरकारमध्ये मोठा सत्तासंघर्ष उफाळून आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी कालच्या मंत्रिमंडळ बैठकीला मुद्दामहून गैरहजर राहत बहिष्कार टाकल्याचा दावा समोर आला होता. याचे मुख्य कारण भाजपकडून डोंबिवलीत शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची मोठ्या प्रमाणात फोडाफोडी केली जात असल्याचा आरोप आहे.

हे वाचलं का?

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर नेमकं काय घडलं?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ बैठकीला हजर होते, मात्र शिवसेनेचे इतर महत्त्वाचे मंत्री अनुपस्थित होते. बैठकीनंतर हे संतप्त मंत्री थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि भाजपच्या या ‘नेते फोडण्याच्या’ धोरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील आगामी महापालिका-नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही फोडाफोडी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाचा>> भाजप नेत्याला नडलेल्या उज्ज्वला थिटेंचा अर्जच झाला बाद, सूनबाई होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची तक्रार अतिशय कठोरपणे हाताळली. त्यांनी शिंदे गटाला ठणकावून सांगितले की, “उल्हासनगरमध्ये तुम्हीच (शिवसेनेने) अशीच फोडाफोडी सुरू केली होती. आता दोन्ही पक्षांनी शिस्त पाळली पाहिजे. परस्परांमधील नेते फोडणे आता थांबले पाहिजे.” त्यामुळे बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, भाजपचे मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र बहिष्काराचा दावा फेटाळला. ते म्हणाले, “कोणताही बहिष्कार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रचारामुळे अनेक मंत्री बाहेरगावी आहेत. भाजपचेही अनेक मंत्री आज अनुपस्थित होते. तिकीट न मिळाल्याने काही स्थानिक नेते पक्ष बदलतात, हे स्वाभाविक आहे. महायुती अतिशय भक्कम आहे, त्यात कसलाही धक्का बसलेला नाही.”

शिवसेनेतील मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेते तथा मंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र स्पष्ट केले की, ही बाब “कौटुंबिक वाद” स्वरूपाची होती आणि ती मुख्यमंत्र्यांसमोर मांडली गेली. त्यांच्या म्हणण्यानुसार, तिन्ही पक्षांच्या (भाजप, शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट) बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आला.

हे ही वाचा>> 'आज परत कोणीतरी गावी जाणार…' भाजपने शिंदेंचे नेते फोडताच आदित्य ठाकरेंनी डिवचलं, भलं मोठं ट्वीट अन्...

“आजपासून नवीन नियम लागू होईल – आम्ही एकमेकांचे नेते, आमदार किंवा नगरसेवक आपापल्या पक्षात घेणार नाही. ही सहमती तिन्ही पक्षांनी मान्य केली आहे. उद्यापासून याची अंमलबजावणी सुरू होईल.”

दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावरून शिंदेंवर तीव्र टीका केली आहे. 

पाहा आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले


असं ट्वीट करत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात डिसेंबर-जानेवारीत होणाऱ्या मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आदी महत्त्वाच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील हा अंतर्गत वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “नेते फोडाफोडी बंदी” करार कितपत पाळला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.