Jalna News : जालना जिल्ह्यातील बदनापूर तहसील कार्यालयात घडलेल्या एका नाट्यमय घटनेने प्रशासनात खळबळ उडवली आहे. शेत रस्त्याचा दीर्घकालीन वाद सोडवून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोप करण्यात आलाय. दरम्यान, लाच मागितल्याने संतप्त शेतकऱ्याने थेट नायब तहसीलदारांच्या टेबलावर पैसे फेकले आहेत. या घटनेचा व्हिडीओ व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
शेत रस्त्याचा प्रश्ना सोडवण्यासाठी 50 हजारांची लाच मागितल्याचा आरोप
बदनापूर तालुक्यातील हलदोला गावातील शेतकऱ्याचा शेत रस्त्याच्या प्रश्नावरून गावातील एका व्यक्तीसोबत वाद सुरू होता. या वादाचा निपटारा करण्यासाठी शेतकऱ्याने तहसील कार्यालयात अधिकृत अर्ज दाखल केला होता. मात्र, शेतकऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे निपटारा न होता निर्णय त्याच्या विरोधात लागला. याबाबत माहिती घेण्यासाठी शेतकऱ्याचे नातेवाईक तहसील कार्यालयात गेले असता, नायब तहसीलदार हेमंत तायडे यांनी रस्ता प्रश्न सोडवण्यासाठी 50 हजार रुपये देण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.
या आरोपांमुळे संतप्त झालेल्या शेतकरी माधव श्रीहरी म्हात्रे यांनी नायब तहसीलदारांकडे थेट पैसे घेऊन जात त्यांचे टेबलावर ते पैसे फेकत निषेध नोंदवला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ उपस्थितांनी मोबाईल कॅमेऱ्यात टिपला आणि तो सोशल मीडियावर वेगाने प्रसारित झाला. व्हिडिओमध्ये शेतकरी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करताना दिसत असून, लाच मागणीच्या आरोपांमुळे जनतेतही संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेने जिल्हा प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजावरही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढील चौकशीची मागणी होत असून, शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमुळे पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त शासनाबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











