Kailas Patil on Operation tiger : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून शिवसेना (UBT) पक्षाला मोठा हादरा बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या नऊ लोकसभा खासदारांपैकी सहा खासदारांनी बंडाचे निशाण फडकवत वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील या सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना अधिकृत पत्र देऊन आपल्याला स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी केली आहे. या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटात केवळ तीनच खासदार शिल्लक राहिले असून, पक्ष नेतृत्वापुढील पेच अधिकच गंभीर झाला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 17 वर्षांची मुलगी तलावातून अंघोळ करून बाहेर आली, 3 नराधमांनी घेरत निर्जनस्थळी..
आमदार कैलास पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत राहणार
या बंडाळीच्या वादळात धाराशिवमधील राजकीय परिस्थिती अधिकच चर्चेत आली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बंडखोरी करत शिंदे गटात जाण्याचा निर्णय निश्चित केला असला, तरी त्याच मतदारसंघातील आमदार कैलास पाटील यांनी मात्र आपली भूमिका अत्यंत ठाम ठेवली आहे. खासदार निंबाळकर यांच्या निर्णयाचा कोणताही परिणाम आपल्या भूमिकेवर होणार नाही, असे स्पष्ट करत आमदार पाटील यांनी आपण आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचे सांगितले आहे. आपण कालही ठाकरेंसोबत होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार आहोत, असे सांगत त्यांनी निष्ठा जपली आहे.
हेही वाचा : संजय राऊत भडकले, राजाभाऊ वाजेंच्या अश्रू तरळले, पत्रकार परिषदेत काय घडलं?
ठाकरेंची 'खिंड' लढवण्याचा केलास पाटलांचा निर्धार
आमदार कैलास पाटील यांनी हातात 'मशाल' घेऊन विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचा आणि ठाकरेंची 'खिंड' लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जेव्हा पहिल्यांदा शिवसेना फुटली होती, तेव्हाही पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती आणि आता दुसऱ्यांदा निर्माण झालेल्या या कठीण प्रसंगातही ते डगमगलेले नाहीत. ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर त्यांनी थेट भाष्य करणे टाळले असले तरी, आपली वैयक्तिक निष्ठा केवळ उद्धव ठाकरे यांच्याशीच असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे ठाकरे समर्थकांकडून स्वागत होत आहे.
सध्याच्या या राजकीय अस्थिरतेच्या काळात शिवसेना (UBT) समोर मोठे संकट उभे राहिले आहे. खासदारांच्या या फुटीमुळे पक्षाची ताकद लोकसभा स्तरावर कमी झाली असून, आता आमदारांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत आहे. एकीकडे बंडखोर खासदार शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत असताना, दुसरीकडे कैलास पाटील यांच्यासारखे निष्ठावंत आमदार पक्षाला बळ देण्याचे काम करत आहेत. या राजकीय संघर्षात आता पुढे काय घडते आणि आगामी काळात महायुती व महाविकास आघाडीची समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT











