Lok Sabha elections 2024 : महाविकास आघाडीची 'वंचित'शिवाय लोकसभेची तयारी, फॉर्म्युला ठरला!

भागवत हिरेकर

16 Mar 2024 (अपडेटेड: 16 Mar 2024, 08:50 PM)

Maha Vikas Aghadi lok Sabha 2024 : महाविकास आघाडीच्या जागावाटपाची घोषणा का होत नाहीये?

वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीची जागावाटपाची घोषणा थांबली.

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.

follow google news

Maha Vikas Aghadi Lok Sabha Seats Sharing 2024 : लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दोन्ही आघाड्यांच्या जागावाटपाबद्दल उत्सुकता वाढली आहे. यात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की, वंचित शिवाय हा प्रश्न उभा राहत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला असून, तो वंचित शिवाय आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नेमके काय सुरू आहे, असा मुद्दा उपस्थित होत आहे. 

हे वाचलं का?

वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये काय सुरूये, अशी चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. अशातच संजय राऊत म्हणाले की, "आमची मनापासून इच्छा आहे की, वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीमध्ये जे सामील झालेले आहेत. त्यांनी आमच्याबरोबर निवडणूक लढवावी. आमच्याकडून त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे." 

एकीकडे संजय राऊत हे वंचित बहुजन आघाडीला चार जागांचा प्रस्ताव दिला असल्याचे सांगत असताना महाविकास आघाडीचा एक फॉर्म्युला समोर आला आहे. तो आधी बघा...

महाविकास आघाडी लोकसभा जागावाटप... 

शिवसेना - 22 जागा
काँग्रेस - 15 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार - 10 जागा
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1 जागा

हेही वाचा >> 'मला नेहमी डावललं जातं', उद्धव ठाकरेंच्या 'त्या' नेत्याचे आरोप! सोडणार साथ?

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा जो फॉर्म्युला समोर आला आहे. त्यात कुठेही वंचितचा उल्लेख नाही. मात्र, दखल घ्यावी अशी बाब म्हणजे शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २२ जागा दिल्या आहे. 

वंचित बहुजन आघाडीला ठाकरेंच्या कोट्यातून 4 जागा? 

लोकसभेच्या जागावाटपात महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा शिवसेनेला (यूबीटी) देण्यात आल्याचे दिसत असले, वंचित बहुजन आघाडीसोबत मनोमिलन झाल्यानंतर 4 जागा, या ठाकरेंच्या कोट्यातून दिल्या जातील. त्यामुळे ठाकरेंच्या वाट्याला १८ जागा राहतील. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. त्या सुत्रानुसार ठाकरे यांना १८ जागा सोडल्या जाऊ शकतात, अशी माहिती आहे. 

वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू

मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सातत्याने वेगवेगळे मुद्दे आणि प्रस्ताव मांडले जात आहेत. यातून महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा मविआच्या गोटात होत आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर मविआ सोबत येतील की नाही, याबद्दलही संदिग्धता वाढत चालली आहे.

हेही वाचा >> तुमच्या लोकसभा मतदारसंघात कोणत्या दिवशी आहे मतदान? 

महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले आहे, पण वंचित बहुजन आघाडीमुळे घोषणा करणे टाळले जात आहे. याला संजय राऊत यांनीही दुजोरा दिला आहे. "आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. त्यावर चर्चा होऊ शकते. म्हणून आम्ही जागावाटपाची घोषणा अद्याप केलेली नाही", असे राऊत म्हणाले आहेत. 

वंचित शिवाय तयारी सुरू 

मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीने तीन पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना जिल्हानिहाय बैठका घेण्यास सांगितले होते. वंचित शिवाय महाविकास आघाडीने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. 

    follow whatsapp