Mahavikas Aghadi legislative council seat : महाविकास आघाडीमध्ये विधानपरिषदेच्या एकमेव जागेवरून राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांतर्गत उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसने या जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावरच सहमती दर्शवण्याची अट घातली असतानाही, पक्षातील इतर इच्छुक नेत्यांनी आपले प्रयत्न सोडलेले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी अद्याप स्वतःच्या उमेदवारीबाबत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही, नेमकी याच संधीचा फायदा घेत शिवसेनेच्या गोटातून अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे. मातोश्रीवर आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी विविध माध्यमांतून वशिला लावण्यास करण्यास सुरुवात केली असून, यामुळे पक्षात एका जागेसाठी अनेक दावेदार निर्माण झाले आहेत.
ADVERTISEMENT
नेत्यांची मोर्चेबांधणी आणि रश्मी ठाकरेंसोबत चर्चा
विधानपरिषदेत मविआच्या दृष्टीने केवळ एकमेव जागा आहे. या जागेसाठी पक्षाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट रश्मी ठाकरे यांच्याकडे उमेदवारीसाठी गळ घातल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दुसरीकडे, कोकणातील आक्रमक नेते वैभव नाईक आणि विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खासदार संजय राऊत यांच्यामार्फत आपली बाजू लावून धरण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. केवळ हेच नेते नव्हे, तर पक्षाचे सचिव आणि युवा सेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी सुरज चव्हाण यांच्या नावासाठी स्वतः आदित्य ठाकरे शिफारस करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. प्रत्येक नेता आपल्या परीने 'मातोश्री'वर वजन वापरून उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी कसरत करत असून, यामुळे पक्षप्रमुखांसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकरांचा वेगळा पवित्रा
एकीकडे अनेक नेते या जागेवर डोळा ठेवून असताना, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. या दोन्ही नेत्यांचा असा आग्रह आहे की, विधानपरिषदेच्या या एकमेव जागेवर स्वतः उद्धव ठाकरे यांनीच निवडून जावे. उद्धव ठाकरे सभागृहात असणे पक्षाच्या दृष्टीने आणि महाविकास आघाडीच्या मजबुतीसाठी आवश्यक असल्याचे या गटाचे मत आहे. मिलिंद नार्वेकर आणि अनिल देसाई यांनी ठाकरेंना निवडणूक लढवण्यासाठी विनंती केली असून, काँग्रेसच्या अटीनुसार उद्धव ठाकरेंच्या नावाला विरोध होण्याची शक्यता कमी असल्याने त्यांनीच मैदानात उतरावे, असा सूर या निकटवर्तीयांनी लावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी अद्याप स्वतःचे कार्ड ओपन न केल्यामुळे 'मातोश्री'वरील ही लॉबिंग दिवसागणिक वाढत चालली आहे. शिवसेनेतील जुन्या जाणत्या नेत्यांपासून ते नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण या एकमेव जागेसाठी आपले नशीब आजमावत आहेत. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात की स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात उतरतात, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











