Manoj Jarange Patil hunger strike : जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा समाज बांधवांची आज तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांची भेट घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीत दाखल होत आहेत. या प्रचंड गर्दीचे दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
ADVERTISEMENT
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी अंतरवाली सराटीत मराठा समाजाचा जनसागर पाहायला मिळत आहे. विविध भागांतून आलेल्या मराठा समाज बांधवांमुळे परिसरात मोठी गर्दी झाली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव दाखल झाल्याचे या ड्रोन दृश्यातून पाहायला मिळत आहे. अंतरवाली सराटीत जमलेला हा जनसागर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या कोणत्या?
हैदराबाद गॅझेटनुसार 4 सप्टेंबरपासून मराठा समाजाने कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. तसेच सातारा आणि कोल्हापूर गॅझेटचाही जीआर सरकारने काढावा, अशी मागणी त्यांनी मंत्र्यांकडे केली आहे. मंत्रालयात आरक्षण कक्ष नको, तर मराठा-कुणबी कक्ष स्थापन करा, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली आहे. या विविध मागण्यांसाठी त्यांचे आमरण उपोषण सुरू आहे.
मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नाही - मनोज जरांगे
दरम्यान, मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मंत्र्यांना मोकळ्या हाताने परत पाठवणार नाही, एकाच्या ठिकाणी दोन सलाईन लावून घेतो, पण उपोषण मागे घेणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. मी जर असे केले तर मराठा समाजाचे वाटोळे होईल, ते मला होऊ द्यायचे नाही, असे जरांगे पाटील म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांना जर मराठा समाजाला साथ द्यायची असेल तर मनापासून साथ द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT












