नागपूर: 'मला दोष दिले, शिव्या दिल्या.. तरीही मी समाजाकरिता काम कालही करत होतो, आजही करत आहे. उद्याही करत राहील. प्रत्येक समाजाकरिता काम करतो. काम करताना कधी शिव्या मिळतात कधी फुलांचे हारही मिळतात.' अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली.
ADVERTISEMENT
पाहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
'हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरिता आमची सुरुवातीपासून तयारी...'
'एक चांगला तोडगा, मराठा समाजाच्या हिताचा तोडगा आज मंत्रिमंडळ उपसमितीने काढला. त्यामुळे जे काही उपोषण चालू होतं ते उपोषण संपविण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरिता आमची सुरुवातीपासून तयारी होती. पण त्यातील महत्त्वाचा विषय असा होता की, त्याठिकाणी मनोज जरांगे यांची जी मागणी होती की, सरसकटची त्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या.'
हे ही वाचा>> Maratha Reservation GR: सरकारचा मोठा निर्णय.. पहिला GR आला समोर, वाचा नेमकं काय आहे त्यात! GR जसाच्या तसा
'हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय बघता अशा प्रकारे सरसकट करणं शक्य नव्हतं. विशेषत: आपण याठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की, या संदर्भात वस्तुस्थिती त्यांच्या लोकांच्या देखील लक्षात आणून दिली. मंत्रिमंडळ उपसमितीच्या देखील लक्षात आणून दिलं की, आपल्या कायद्याप्रमाणे, संविधानप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं ते व्यक्तीला मिळत असतं. म्हणूनच अशाप्रकारे सरसकट करता येणार नाही. ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही.'
'त्यांनी देखील काल ती भूमिका समजून घेतली, स्वीकारली.. जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका. याबाबत उपसमितीमध्ये चर्चा झाली त्याचा जीआर तयार झाला. त्यात काही बदल होते ते बदल केले. त्यासंदर्भात जीआर जारी झाला आहे.'
'हैदराबाद गॅझेटिअरमुळे नोंदी शोधणं सोप्पं होणार आहे. वंशावळ शोधून असं आरक्षण देता येणार आहे. त्यामुळे पुरावा मिळेल त्यांना आरक्षण मिळेल. तसंच ओबीसी समाजात जी भीती होती की, सरसकट सगळे अशाप्रकारे जे आरक्षण घेतील आणि इतरही त्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील. पण आता तसं काही होणार नाही.' असं फडणवीस यावेळी म्हणाले.
हे ही वाचा>> Maratha Reservation: 'त्या' मागण्या मान्य अन् जरांगेंनी उपोषण सोडलं, मराठा तरूणांना दिला 'हा' आदेश!
'ज्यांचा खरा दावा आहे पण कागदपत्रांअभावी त्यांना ते आरक्षण मिळत नव्हतं अशा मराठा समाजाचा लोकांना याचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, मराठा समाजाकरिता अतिशय चांगला निर्णय विशेषत: हा सगळा प्रकार मराठवाड्यात होता. कारण तिथे रेकॉर्ड्स नाहीएत. हा समाधानाकारक तोडगा काढण्यात आला आहे. जो कोर्टातही टिकेल.'
'जेव्हा टीका झाली तेव्हाही मी विचलित झालो नाही'
'याशिवाय थोडा मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. त्याबाबत मुंबईकरांची दिलगिरी मी व्यक्त करतो. पण मला असं वाटतं की, चांगला निर्णय आपण घेतला आहे.'
'राजकारणात सातत्याने टीकाही सहन करावी लागते आणि लोकं तुमचं स्वागत करतात. जेव्हा टीका झाली तेव्हाही मी विचलित झालो नाही. माझ्यासमोर एकच ध्येय होतं की, समाजाला न्याय द्यायचाय. दोन समाज एकमेकांसमोर येणार नाहीत अशा प्रकारे तोडगा काढावा लागेल असा प्रयत्न होता.'
'म्हणून या संदर्भात जे-जे काही कायदेशीर आहे त्याचा अभ्यास करून निर्णय घेतला आहे. याचं श्रेय मंत्रिमंडळ उपसमितीला दिलं पाहिजे.'
'मला दोष दिले, शिव्या दिल्या.. तरीही मी समाजाकरिता काम कालही करत होतो, आजही करत आहे. उद्याही करत राहील. प्रत्येक समाजाकरिता काम करतो. काम करताना कधी शिव्या मिळतात कधी फुलांचे हारही मिळतात. आमच्याकरिता महाराष्ट्राची सामाजिक वीण महत्त्वाची आहे.' असं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
