Mumbai Worli Metro Station : मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसाने वरळीतील नव्याने बांधलेल्या भुयारी मेट्रो स्थानकाला (मेट्रो लाइन ३) जोरदार फटका बसला आहे. आचार्य अत्रे चौकातील या स्थानकात पाणी साचल्याने मेट्रो सेवेत अडथळे निर्माण झाले असून, प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पहिल्याच पावसात मेट्रो स्थानकाची ही अवस्था पाहता, प्रकल्प व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ADVERTISEMENT
पाणी साचण्यामुळे प्रवाशांची तारांबळ
हे ही वाचा >> मुंबईसह उपनगरात पावसाचं थैमान; मध्य रेल्वेतील 'या' रेल्वेस्थानकात शिरलं पाणी, मुंबईकरांची दैना
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोचे दरवाजे उघडताच स्थानकात तळ्यासारखं पाणी साचलेलं दिसतंय. पाण्यामुळे प्रवाशांना चालणे कठीण झाले, तर काही ठिकाणी पाणी खाली उतरताना पायऱ्यांवरून वाहत होते. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली असून, मेट्रो प्रशासनाच्या पावसाळी तयारीबाबत संताप व्यक्त केला जात आहे. "एवढ्या मोठ्या प्रकल्पात अशी परिस्थिती खेदजनक आहे. पावसाळ्यापूर्वी याची काळजी का घेतली गेली नाही?" अशी विचारणा एका प्रवाशाने केली.
प्रशासनावर टीकेची झोड
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट्सनुसार, वरळीतील मेट्रो स्थानकात पाणी साचल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नालेसफाई आणि ड्रेनेज व्यवस्थेच्या नियोजनातील कमतरतेमुळे पाणी स्थानकात शिरल्याचा अंदाज आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी प्रशासनाला तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
