नांदेड: नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत यंदा राजकीय चुरस वाढताना दिसत आहे. इथं महत्त्वाचं म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत संघर्ष समोर आल्यानं जोरदार चर्चा सुरुय. भाजप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने सध्या तरी निवडणूक बहुरंगी झालय. विशेष म्हणजे भाजपमध्ये प्रवेशानंतर अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी मिळाल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
ADVERTISEMENT
या निवडणुकीत कुणाकडे किती मतं? गणित कसं आहे? अशोक चव्हाण यांना विधानपरिषद जड जाणार का? उमेदवारांची नेमकी ताकद काय? जाणून घ्या नेमकं गणित काय.
नांदेड विधान परिषदेचं नेमकं गणित काय?
अपडेट अशी आहे की, नांदेड विधानपरिषद निवडणुकीसाठी दाखल झालेले ८ उमेदवारांचे एकुण 17 अर्ज मंगळवारी झालेल्या छाननीत वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ जून असल्याने राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. नांदेडच्या राजकीय वर्तुळात अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार असे संकेत आहेत. मात्र दोन्ही बाजूला अंतर्गत संघर्ष आहे. हा संघर्ष मॅनेज करण्यात कोण बाजी मारतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
आता महायुतीच्यावतीने भाजपचे अमरनाथ राजूरकर, काँग्रेसचे रामदास पाटील, यांच्यासह ज्योतिबा खराटे, कृष्णा नागेश पाटील (अपक्ष),प्रविण पाटील चिखलीकर, माधवराव पवार, पंकज गायकवाड, प्रशांत इंगोले या आठ उमेदवारांनी एकुण 17 अर्ज दाखल केले होते. यापैकी अमरनाथ राजूरकर आणि रामदास पाटील या दोघांनीही नामनिर्देशनपत्रांसोबत आपापल्या पक्षाचा एबी फॉर्म दाखल केला आहे.
नांदेडमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर असा सामना प्रत्येक निवडणुकीत पाहायला मिळतो. त्यामुळे याही निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्या विरोधात शड्डू ठोकत आपले पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
शिवाय शिवसेना UBT गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे नांदेड येथे विधान परिषदेची निवडणूक ही चौरंगी होणार का अशा चर्चा आता रंगू लागले आहेत. बंड शमवण्यासाठी आघाडी आणि महायुतीला किती यश मिळतंय हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
या निवडणुकीत विरोधकांकडून अशोक चव्हाणांना घेरण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ महायुतीच्या बाजूने असल्याचे चित्र आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाची भूमिका निर्णायक असणार आहे तसेच विरोधकांची एकजूट कितपत प्रभावी ठरते यावर या निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे.
नांदेड विधानपरिषद निवडणुकीत 446 मतदार आहेत. सध्याच्या संख्या बळानुसार भाजपकडे 138, काँग्रेस 92, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 82, मजपा 39, शिवसेना शिंदे गटाकडे 23, एमआय एम पक्षाचे 20, शिवसेना ठाकरे गट 19, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 13, आणि वंचित बहुजन आघाडीकडे 6 असे संख्या बळ आहे.
या निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. राजूरकर हे चव्हाणांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळं इथं कोण बाजी मारतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT











