pm modi monsoon session youth message : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांच्या भूमिकेमुळे हे अधिवेशन गदारोळात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील युवकांना संदेश दिला. विरोधी पक्षांना संसदेचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन केले आणि कोणाचेही नाव न घेता '56 वर्षांच्या तरुणा'ला टोला लगावला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात तोबा गर्दी, ड्रोनद्वारे घेतलेला व्हिडीओ पाहाच VIDEO
संसदेचे अधिवेशन फलदायी ठरो : नरेंद्र मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार असून सरकार या सत्रात अनेक महत्त्वाची विधेयके मांडणार आहे. त्यांनी विरोधी पक्षांनी संसदीय कामकाज सुरळीत आणि विधायक पद्धतीने चालावे यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. "पावसाळा असो किंवा हिवाळी अधिवेशन, दोन्ही जर सक्रिय आणि परिणामकारक असतील तर त्याचा देशाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी फायदा होतो. त्यामुळे पाऊसही सक्रिय राहो आणि संसदेचे अधिवेशनही फलदायी ठरो, अशीच प्रार्थना आहे," असे ते म्हणाले.
हेही वाचा : CJP च्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा, 5000 जवान तैनात; कलम 163 लागू
पीएम मोदींचा देशातील युवकांना संदेश
युवकांना उद्देशून बोलताना पंतप्रधानांनी गेल्या एका महिन्यात देशाने अनेक उल्लेखनीय यश संपादन केल्याचा उल्लेख केला. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि अंतराळ क्षेत्रात भारताने अभिमानास्पद कामगिरी केली असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनापूर्वी एक भारतीय नागरिक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर होता. तर दोन दिवसांपूर्वी भारतातील युवकांच्या नेतृत्वाखालील एका स्टार्टअपने अशी मोठी कामगिरी केली, जी आतापर्यंत मोजक्याच देशांना साध्य झाली आहे, असे त्यांनी सांगितले. ही केवळ योगायोगाची घटना नसून देशातील युवकांच्या क्षमता आणि आकांक्षा अंतराळाइतक्याच अमर्याद असल्याचा हा ठोस संदेश असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारतीय युवकांनी आत्मविश्वास निर्माण केला असून जगात भारताचा सन्मान वाढवला आहे, असे त्यांनी नमूद केले. याचवेळी त्यांनी , "जिथे तर्क आणि तथ्य असतात तिथे गोंधळ किंवा आरडाओरड करण्याची गरज नसते. शांतपणेही प्रभावीपणे आपले मत मांडता येते," असे सांगितले.
पीएम मोदींचा राहुल गांधींना अप्रत्यक्ष टोला
युवकांचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी यांनी कोणाचेही नाव न घेता '56 वर्षांच्या तरुणा'वरही भाष्य केले. भारतातील स्टार्टअपमध्ये काम करणाऱ्या युवकांच्या टीमचे सरासरी वय केवळ 28 वर्षे असल्याचे सांगत त्यांनी, "अशा तरुणांनी ही कामगिरी केली आहे. मी कोणत्याही 56 वर्षांच्या तरुणाबद्दल बोलत नाही," असे म्हटले. स्टार्टअपमधील युवकांचे कौतुक करताना त्यांनी हा उल्लेख केला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा जन्म 19 जून 1970 रोजी झाला असून त्यानुसार त्यांचे वय 56 वर्षे इतके आहे. पीएम मोदींनी त्यांचाचा उल्लेख केल्याचं बोललं जातंय.. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी '56 वर्षांच्या तरुणा'चा उल्लेख करत राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याची चर्चा सुरू झाली. मात्र आपल्या भाषणात त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही.
आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदी यांनी भारताची आर्थिक ताकद आणि विकासाचाही उल्लेख केला. जगातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या युद्धांमुळे, विशेषतः पश्चिम आशियातील संघर्षामुळे ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. पेट्रोल, डिझेल, एलपीजी, खत आणि रसायनांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला, तरीही भारताने 7.7 टक्के विकासदर कायम ठेवला आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवले, असे त्यांनी सांगितले. राजस्थानमधील मोठी ऑईल रिफायनरी, तिसरा सेमीकंडक्टर प्रकल्प आणि ग्रीन हायड्रोजनवर चालणारी सर्वात शक्तिशाली इंजिन असलेली आणि सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन देशाला समर्पित केल्याचाही त्यांनी उल्लेख केला. शेवटी त्यांनी सर्व खासदारांना संसदेत अर्थपूर्ण चर्चा करण्याचे आवाहन करत, तर्क आणि तथ्यांच्या आधारे सभागृह समृद्ध करण्याची तसेच प्रत्येक मताचा सन्मान राखण्याची अपेक्षा व्यक्त केली.
ADVERTISEMENT












