सनातन धर्म अस्पृश्यतेवर विश्वास ठेवतो अन् जीव घेतो, छळ केल्याने मृत्यू झालेल्या 5 जणांबाबत आंबेडकरांची पोस्ट

मुंबई तक

15 Oct 2025 (अपडेटेड: 15 Oct 2025, 01:00 PM)

Prakash Ambedkar facebook post : सनातन धर्म अस्पृश्यतेवर विश्वास ठेवतो अन् जीव घेतो, छळ केल्याने मृत्यू झालेल्या 5 जणांबाबत आंबेडकरांची पोस्ट

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

"सनातन धर्म अस्पृश्यतेवर विश्वास ठेवतो अन् जीव घेतो"

point

छळ केल्याने मृत्यू झालेल्या 5 जणांबाबत आंबेडकरांची पोस्ट

Prakash Ambedkar facebook post : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे. त्यांनी मानसिक छळ केल्याने मृत्यू झालेल्या 5 जणांबाबत भाष्य केलंय. "सनातन धर्म अस्पृश्यतेवर विश्वास ठेवतो अन् जीव घेतो", असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी छळ केल्याने मृत्यू झालेल्या 5 जणांचा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी, रोहित वेमुल्ला, पायल तडवी, IPS वाय पूरन कुमार आणि अक्षय भालेराव या पाच जणांचा समावेश आहे.

हे वाचलं का?

 

सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू

सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याने परभणी जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांवर एका आठवड्याच्या आत एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक न्यायालयीन समिती नेमली आहे. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणात कारवाई करत, तीन पोलिसांवर कारवाई करण्यात आली आणि काही कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते.

रोहित वेमुला याची 2016 मध्ये आत्महत्या

रोहित वेमुला हैदराबाद विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी होता. त्याने 17 जानेवारी 2016 रोजी आत्महत्या केली, ज्यामुळे देशभरात मोठे आंदोलन आणि निदर्शने झाली. रोहित वेमुला हा आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनचा सदस्य होता. त्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) या विद्यार्थी संघटनेशी वाद झाला होता. त्यानंतर, विद्यापीठाने त्याला आणि इतर चार विद्यार्थ्यांना वसतिगृहातून निलंबित केले. वसतिगृहातून काढल्यानंतर, रोहितने 17 जानेवारी 2016 रोजी आत्महत्या केली. आपल्या सुसाइड नोटमध्ये त्याने "माझा जन्म एक जीवघेणा अपघात होता" असे लिहिले होते.

जातीवाचक शेरेबाजीला कंटाळून पायल तडवी यांची आत्महत्या

डॉ. पायल तडवी या मुंबईतील बी.वाय.एल. नायर हॉस्पिटलमध्ये प्रसूती आणि स्त्रीरोग विभागात द्वितीय वर्षाच्या शिकाऊ डॉक्टर होत्या. त्या मूळच्या जळगाव जिल्ह्यातील आदिवासी भिल्ल समाजातील होत्या. आरक्षण कोट्यातून प्रवेश घेतल्यामुळे वरिष्ठ सहकारी त्यांना मानसिक त्रास देत होते आणि जातीवाचक शेरेबाजी करत होते, असा त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. या त्रासाला कंटाळून अखेर 22 मे 2019 रोजी पायल तडवी यांनी त्यांच्या वसतिगृहातील खोलीत आत्महत्या केली.

वाय. पूरन कुमार यांची आत्महत्या 

पोलिस अधिकारी आयपीएस वाय. पूरन कुमार यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे. 2001 च्या बॅचचे हे आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार कधीच सत्तेसमोर झुकले नाहीत. ते भ्रष्टाचार, प्रशासनातील विसंगती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहारांविरोधात नेहमीच आवाज उठवताना पाहायला मिळायचे. मात्र, 7 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांनी चंदीगडमधील त्यांच्या सरकारी निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या आत्महत्यामागे जातीवाद आणि प्रशासकीय दबाव असल्याचे आरोप झाले आहेत.

अक्षय भालेरावची हत्या 

अक्षय भालेराव हा नांदेडमधील तरुण होता. ज्यांची 1 जून 2023 रोजी नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावात हत्या करण्यात आली. ही हत्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याच्या कारणावरून झाल्याचा आरोप आहे.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

VIDEO : फटाका स्टॉलचं हटके प्रमोशन रील स्टारच्या अंगलट, पोलिसांनी उचलल्यानंतर म्हणाला, 'वाकड पोलीस जिंदाबाद'