"पूल धोकादायक होता तर तिथे...", कुंडमळातील घटनेवरुन राज ठाकरेंचा सरकारवर संताप

मुळात हा प्रसंग का येतो ? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? असे संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केले आहेत.

Mumbai Tak

मुंबई तक

16 Jun 2025 (अपडेटेड: 16 Jun 2025, 12:53 PM)

follow google news

Raj Thackeray : पुण्यातील मावळ तालुक्यात कुंडमळा या ठिकाणी  इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळला. यामध्ये अनेकजण वाहून गेले. या घटनेत किमान 4 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं असून आणि 51 जण जखमी झाले. या प्रकरणावरुन आता राज ठाकरे यांनीही सरकारवर संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी या घटनेवरुन अनेक प्रश्न उपस्थित करत एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. 

हे वाचलं का?

राज ठाकरे काय म्हणाले?

"काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही जणं मृत्युमुखी पडलेत. नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाहीये. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. 

हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला ? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, 'बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे...'

हे ही वाचा >> पुणे- दौंड रेल्वे मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग; प्रवाशांचा जीव मुठीत, नेमकं घडलं काय?

पण मुळात हा प्रसंग का येतो ? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळयाच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही ? बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत ? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग ?

पण लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवं. 

हे ही वाचा >> गोदावरीत अंघोळीला उतरले, एकाच कुटुंबातले 5 तरूण बुडाले, बाजूलाच बोट असूनही...

आत्ता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरांत पाणी साठणं, रस्त्यांची चाळण होणं, पूल पाडणं अशा घटना सुरु झाल्यात. या सगळ्यात सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पहावं" असं राज ठाकरे म्हणालेत. 

    follow whatsapp