Raj Thackeray : राज ठाकरे खोटं बोलले?, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुणी बांधली?

मुंबई तक

03 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:49 AM)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा अनेक कारणांनी चर्चेत आहे. यातील एक मुद्दा म्हणजे लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधल्याचं विधानं. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरूनच राज्यात वाद रंगला आहे. राज ठाकरे यांच्या विधानाबद्दल इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी महत्त्वाचं मत मांडलं आहे. राज ठाकरेंचं विधान काय? “तुमच्या मतांच्या राजकारणासाठी हे सगळं ध्रुवीकरण […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा अनेक कारणांनी चर्चेत आहे. यातील एक मुद्दा म्हणजे लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधल्याचं विधानं. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरूनच राज्यात वाद रंगला आहे. राज ठाकरे यांच्या विधानाबद्दल इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी महत्त्वाचं मत मांडलं आहे.

हे वाचलं का?

राज ठाकरेंचं विधान काय?

“तुमच्या मतांच्या राजकारणासाठी हे सगळं ध्रुवीकरण करायचं आहे. मग एवढचं आहे, तर मग रायगडावरची समाधी ही कुणी बांधली? शिवछत्रपतींची समाधी कुणी बांधली, ती आमच्या लोकमान्य टिकळांनी बांधली. टिकळांना तुम्ही आता काय ब्राह्मण म्हणून बघणार आहात का? टिकळांनी जे पहिलं वर्तमानपत्र काढलं त्याचं नाव काय… मराठा. हे पवारसाहेब कधी सांगणार नाहीत,” असं ठाकरे म्हणाले.

इंद्रजित सावंत काय म्हणाले?

इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत ‘मुंबई Tak’शी बोलताना म्हणाले, “काल राज ठाकरेंनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाजांची समाधी टिळकांनी बांधल्याचं विधान केलं. ते विधान धादांत खोटं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही शंभूराजांनी बांधली. १८१८ मध्ये कर्नल पॉर्थर याने याचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर महात्मा फुले १८८९-८० मध्ये रायगड किल्ल्यावर गेले होते. त्यांनी समाधीचा पुर्नशोध घेतला. झाडाझुडपात असलेली समाधी मोकळी केली. जेम्स डग्लस नावाचा इंग्रज अधिकारी किल्ल्यावर जाऊन आला. त्यांनी लिहिलेल्या लेखात याचा उल्लेख केलेला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या जिर्णोद्धारासाठी निधी गोळा करण्याबद्दलचं पत्राचा हवाला इंद्रजित सावंताकडून दिला जात आहे. १८९५ मध्ये. “लोकमान्य टिळक छत्रपती शाहू महाजांना १८९५ मध्ये भेटायला आले होते. त्यावेळचं आहे. शाहू महाराजांचे दिवाण होते सबनीस. त्या दिवाणांना लिहिलेलं हे पत्र आहे. त्या पत्रातील आशय असा आहे की, शिवाजी महाराजांच्या समाधीचं काम सुरू होतं. त्यासंदर्भातील हे पत्र आहे. शाहू महाराजांची भेट मिळावी. निधी मिळावा, अशा आशयाचं हे पत्र आहे. यानंतरची जी तीन पत्रं आहेत, त्यात शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या कामासाठी टिळकांना भरघोस मदत दिल्याचा उल्लेख आहे.

शिवसमाधीचा जिर्णोद्धार झाला तो, १९२५-२६ मध्ये आणि टिळकांचा मृत्यू झाला १९२० मध्ये. टिळकांनी समाधीचा जिर्णोद्धार करायचा म्हणून १८९५ पासून गोळा करायला सुरूवात केली. १९२० मध्ये त्यांचं निधन झालं. या २५ वर्षाच्या कालावधीत त्यांनी हजारो रुपये जमा केले होते. त्यातील एक पैसाही त्यांनी रायगडावरील शिवस्मारकासाठी खर्च केला नाही. यामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. शिवसमाधी संभाजीराजांनी बांधली. १८१८ कर्नल पॉर्थर रायगडला गेले. त्यांनी उल्लेख करून ठेवला आहे. महात्मा फुले १८८९-८० मध्ये गेले होते. जेम्स डग्लस नावाचा इंग्रज अधिकारी किल्ल्यावर जाऊन आला. त्यांनी लिहिलेल्या लेखात याचा उल्लेख केलेला आहे.

रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी संदर्भातील ब्रिटीश अधिकाऱ्यांची पत्र, नकाशे, फोटो उपलब्ध आहेत. १८८५ नंतर त्यांनी त्या समाधीची देखरेख केली. याचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहे. तत्कालीन पुरातत्व खात्याचे महासंचालक जॉन मॉर्शल होते. त्यांच्यापर्यंत हा विषय गेला होता आणि समाधीचं कशा पद्धतीने जतन करावं, याबद्दल त्यांनी निर्देश दिले होते.ठ”

“त्यामुळे जे काही राज ठाकरे सांगतात की, टिळकांनी समाधी बांधली. ते सगळ खोटं आहे. याची सगळी माहिती शिवाजी मेमोरियल्स : टूवर्डस ब्रिटिश अॅटिट्यूड (Shivaji memorials: The British attitude) असं खोब्रेकरांचं पुस्तक आहे. त्यात हे सगळे पत्रव्यहार उपलब्ध आहेत,” असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp