Sharad Pawar on Parth Pawar , मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडू लागल्या. अजितदादांच्या निधनांनंतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे सूनेत्रा पवारांच्या शपथविधीला अनुपस्थितीत असलेल्या पार्थ पवारांनी त्याच दिवशी दुपारी खासदार शरद पवार यांची भेट घेतली होती. दरम्यान, या भेटीदरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा झाली का? पार्थ पवार कोणत्या विषयावर बोलण्यासाठी आले होते? याबाबत स्वत: शरद पवार यांनी ऑफ रेकॉर्ड माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
शरद पवार यांनी स्पष्ट केले की, पार्थ पवार हे त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. मात्र ही भेट केवळ अजित पवार यांच्या स्मारकाच्या उभारणीसंदर्भातील चर्चेसाठी होती. या भेटीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
सूनेत्रा पवारांबाबत शरद पवारांचं भाष्य
यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबतही भूमिका मांडली. सुनेत्रा पवार यांनी पुढील काळात बारामती आणि महाराष्ट्रात राहूनच काम करणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच त्या आता राज्यसभा सदस्य नसल्यामुळे संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार नसल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीसांचा वैयक्तिक निर्णय - शरद पवार
अजित पवारांचं निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी प्रचार करायचा नाही, असा निर्णय घेतलाय. यावर बोलताना शरद पवार म्हणाले हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र, आगामी निवडणुकांमध्ये सर्व उमेदवार ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हावरच निवडणूक लढवणार का, या प्रश्नावर मात्र शरद पवार यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निर्णय प्रक्रियेत मी थेट सहभागी नव्हतो, असे शरद पवारांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी मी अजित पवार यांच्याकडे सोपवली होती. स्थानिक राजकीय समीकरणे अजित पवार स्वतः पाहात होते, असेही त्यांनी नमूद केले.
सुनील तटकरे यांनी ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय हा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी असल्याचे स्पष्ट केले होते. शिवाय यावेळी सुनील तटकरे विलीनीकरणाचा विषय टाळत असल्याचं पाहायला मिळालं होतं. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, तटकरे सध्या काय वक्तव्य करत आहेत, याची आपल्याला माहिती नाही.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र त्यांच्या शपथविधीबाबत आपल्याला पूर्वकल्पना नव्हती, असे शरद पवार यांनी यापूर्वी सांगितले होते. दरम्यान, शरद पवारांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेला आता ब्रेक लागल्याचं स्पष्ट झालंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











